Corona
Corona sarkarnama
देश

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' दोघांनी उडवली देशाची झोप

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या (Corona) 'ओमीक्रोन' या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. भारतानेही आता सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे. या व्हेरिएंटचा देशातील शिरकाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आरोग्य मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. दक्षिण अफ्रिकेतून आलेला 'ओमीक्रोन' हा कोरोनाचा नवा विषाणू 'डेल्टा'पेक्षा कित्येक पटींनी अधिक संसर्गजन्य असल्याने बाहेरच्या देशांतून येणाऱ्या विमान प्रवाशांची काटेकोर आरोग्य तपासणी करण्याबाबत अजिबात बेसावधपणा बाळगू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या उच्चस्तरीय बैठकीत केल्या आहेत.

विशेषतः ज्या देशांत हा नवा कोरोना अवतार धुमाकूळ घालू लागला आहे. त्या देशांतील प्रवाशांची विशेष तपासणी करावी, विमानांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरआढावा घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत. मोदी यांनी देशातील लसीकरणाचाही आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान नियमांत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा फेरआढावा घ्या, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्रिसूत्रीवर भर देण्याचे आवाहन

कोरोना चाचण्या, संभाव्य रुग्णांचा माग काढत त्वरित उपचारांना प्रारंभ व लसीकरणाची गती वाढविणे ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नव्या संकटाबाबत राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांबरोबर समन्वय साधून काम करावे व देशात नव्या विषाणूबाबत जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. मुंबई विमानतळावर आफ्रिकी प्रवाशांसाठी विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर दिल्लीसह इतर विमानतळांवर तशा उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे. आजच्या बैठकीत केंद्रीय सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण व नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल हे सहभागी झाले आहेत. याच बैठकीमध्ये देशातील कोरोना संसर्गाचे नियंत्रण व लसीकरणाबद्दलही पंतप्रधानांनी आढावा घेतला.

केंद्राच्या राज्यांना सूचना

राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात नव्या व्हेरियंटबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना केली. ज्या रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळतील ते नमुने त्वरित राष्ट्रीय जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेकडे पाठवावेत, असे सांगण्यात आले. नव्या विषाणूबाबत भारताने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोट्स्वाना व इस्त्राईलमधून येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळांवरच चाचण्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमान वाहतूक मंत्रालयाला तसे निर्देश देण्यात आले आहेत. यात अजिबात निष्काळजीपणा करू नये, असेही बजावण्यात आले आहे.

पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेता, नव्या विषाणूचे रुग्ण आढळणाऱ्या देशांसोबतची विमानसेवा पूर्णपणे थांबविण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करून द्यावी, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या सुचना

नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सज्ज राहा. सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या भागावर लक्ष द्यावे, कंटेन्मेंट झोनची आखणी हवी. लोकांना सावधगिरी बाळगत नियम पाळावेत. आंतरराष्ट्रीय प्रवासाला देण्यात आलेल्या मोकळीकीचाही फेरआढावा घेतला जावा. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा वेग वाढवावा. लोकांना दुसरा डोस वेळेत मिळावा म्हणून सर्वच राज्य सरकारांनी काळजी घेणे गरजेचे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेले २ प्रवासी बंगळुरू विमानतळावर पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. आतापर्यंत बंगळुरूमध्ये 594 प्रवाशी परदेशातून दाखल झाले आहेत. 94 प्रवाशी हे एका दक्षिण आफ्रिका देशातील आहेत. पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण विलिगीकरणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT