narendra modi | uddhav thackeray Sarkarnama
देश

Video Uddhav Thackeray : "पापा को बोलो वॉर रूकवा दो", बांगलादेशवरून ठाकरेंनी मोदींना डिवचलं

Akshay Sabale

Maharashtra Political News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात हिंसाचार पेटला आहे. येथे सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासह बांगलादेशात असलेल्या हिंदू समाजावर देखील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.

"पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात. तर, पप्पांना सांगा हे युद्धा पण थांबावायला. तसेच, मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणाऱ्यांनी बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेले अत्याचार थांबवून दाखवावेत," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना ललकारलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणाऱ्यांमध्ये हिंमत असेल, तर बांगलादेशात हिंदुंवर होत असलेले अत्याचार थांबवून दाखवावेत. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी कुठे होते? बांगलादेशच्या प्रकरणावरून पंतप्रधानांनी संसदेत किंवा बाहेर कुठे प्रतिक्रिया व्यक्त केली का?"

"पंतप्रधान मोदी (Narendra Modi) जीने युक्रेन आणि रशियाची वॉर रूकवा दी... तो पापाको बोलो.. ये भी वॉर रूकवा दो... बांगलादेश मैं हिंदूओपर अत्याचार हो रहे हैं पापा.. अत्याचार रूकवा दो पापा...," अशी हिंदीतून टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.

"बांगलादेशसारखी परिस्थिती कुठेही उद्भवू नये. बऱ्याच ठिकाणी जनतेचा संयम संपत चालला आहे. अलीकडेच इस्रायलमधील लाखो लोक घराबाहेर पडले होते. तेथील पंतप्रधानांना घराबाहेर सुद्धा पडता येत नव्हते. तशीच परिस्थिती श्रीलंकेत आणि आता बांगलादेशात निर्माण झाली आहे," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"सर्वसामान्य जनता मजबूत असते. तिच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये. तो जर पाहिला, तर जनतेचं न्यायालय काय असते, हे बांगलादेशात दाखवलं आहे. मणिपूर अजूनही पेटलेलं आहे. काश्मीरमध्ये हिंदुंच्या हत्या होत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील, तर केंद्र सरकारनं ताबडतोब पावले उचलून हिंदुंचं रक्षण केलं पाहिजे. जर शेख हसीन यांना आश्रय देत असाल तर, बांगलादेशमधील हिंदुंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT