Udhayanidhi Stalin Vs Congress Sarkarnama
देश

Udhayanidhi Stalin Vs Congress : “द्रमुकने रक्त-घाम गाळला, काँग्रेस सत्तेसाठी पळाली”; उदयनिधी स्टॅलिन यांचा संताप, ‘पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका’

Udhayanidhi Stalin accuses Congress betraying DMK, triggering fresh political tensions Tamil Nadu and the INDIA alliance : “20 वर्षे आमच्या खांद्यावर बसून सत्ता उपभोगली, विजय मिळताच दगा दिला”; भाजपच्या यशासाठीही काँग्रेसलाच जबाबदार ठरवत उदयनिधी यांनी संताप व्यक्त केला.

Pradeep Pendhare

DMK vs Congress Tamil Nadu politics : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य करत द्रमुक युवा आघाडीचे प्रमुख उदयनिधी स्टॅलिन यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

“काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भविष्यात त्यांच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका,” असे थेट आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. चेन्नई येथे शनिवारी झालेल्या द्रमुक युवा आघाडीच्या बैठकीत उदयनिधी स्टॅलिन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

उदयनिधी म्हणाले, “20 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस (Congress) आमच्या खांद्यावर बसून पुढे गेली. निवडणुकांमध्ये फायदा करून घेतल्यानंतर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. हे द्रमुक कार्यकर्त्यांनी कधीही विसरू नये. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा जवळ करू नका.”

यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) सलग निवडणूक विजयांसाठी थेट काँग्रेसलाच जबाबदार धरले. “केंद्रात भाजपला सलग सत्ता मिळण्याचे श्रेय नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना नसून काँग्रेसच्या कमकुवत नेतृत्वाला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

उदयनिधी स्टॅलिन यांनी द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत काँग्रेसवर कृतघ्नतेचा आरोप केला. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये धर्मनिरपेक्ष आघाडी टिकवण्यासाठी द्रमुकने पूर्ण ताकद लावली. भाजपला तमिळनाडूत रोखण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी रक्त आणि घाम गाळला. जवळपास अस्तित्वहीन झालेल्या काँग्रेसला पाच जागा जिंकून देण्यात द्रमुकचा मोठा वाटा होता,” असे ते म्हणाले.

मात्र, “विजय मिळताच काँग्रेसने सत्तेसाठी पळ काढला. आम्हाला साधी माहिती देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये राजकीय सभ्यता नसल्याचा आरोप करत “आम्ही धडा शिकवला नाही तरी तमिळनाडूची जनता काँग्रेसला धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

आत्मपरीक्षणाची हाक

अलीकडील निवडणुकीतील पराभवावर बोलताना उदयनिधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. “फक्त दोषारोप करून उपयोग नाही. पक्षाची रणनीती, विशेषतः सोशल मीडिया आणि जनसंपर्क यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

द्रमुकचे संघटनात्मक बदलाचे संकेत

घराघरांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यात झालेल्या अपयशाची कबुली देत त्यांनी संघटनात्मक बदल आणि नव्या राजकीय रणनीतीची आवश्यकता अधोरेखित केली. द्रमुकने आता अधिक आक्रमक आणि डिजिटल पातळीवर सक्षम राजकारण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या समीकरणांची चर्चा

उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी आघाडीत नव्या तणावाची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः दक्षिण भारतात भाजपविरोधी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या द्रमुक आणि काँग्रेसमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी लोकसभा आणि राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचे राष्ट्रीय राजकारणात मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT