Narendra Modi Sarkarnama
देश

Union Budget 2024 : मोदींनी सरकारला केली मजबूत तटबंदी; विरोधकांच्या मनसुब्यांना सुरूंग...

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्ममधील पहिल्याच अर्थसंकल्पातून सरकारला मजबूत तटबंदी केली आहे. पुढील पाच वर्षे सरकार स्थिर राहील, याची काळजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांना सुरूंग लागला आहे.

मोदी सरकारला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा टेकू आहे. त्यांच्या भरवशावरच मोदींनी पुढील पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून हेच दोन बाबू मोदींना धोका देतील, अशी भाकितं वर्तवली जात आहे. सरकार फार काळ टिकणार नाही, अशी विधाने केली जात आहे.

अर्थसंकल्पातून मोदींनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. सीतारमण यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी अनेक मोठ्या घोषणा करत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना खूष केले आहे. बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य केली नसली तरी त्यांना भरघोष निधी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशाला तब्बल 15 हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. हे पॅकेज जाहीर होत असताना चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार बाके वाजवून त्याचे स्वागत केले. पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांच्या दिशेने हात उंचावत सूचक संकेत दिले.

अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू खूष होतील यात शंका नाही. त्यामुळे त्यांचा पुढील पाच वर्षे सरकारला पाठिंबा राहील, याची जणू तरतूदच करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जेडीयू आणि टीडीपीकडूनही विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली होती. त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आल्याने मोदींनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असेच त्यांना सांगितले आहे.

बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी काय?

आंध्र प्रदेशला तब्बल 15 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही दिली आहे. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी भागात पायाभूत सुविधा, रायलसीमा, प्रकाशम आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशातील मागास भागांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

नीतिशकुमार यांनाही मोदी सरकारने खूष केले आहे. बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. सुमारे 21 हजार 400 कोटी रुपये खर्चून बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. यांसह दोन्ही राज्यांना अतिरिक्त मदतही केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT