<div class="paragraphs"><p>Ajay Mishra</p></div>

Ajay Mishra

 

Sarkarnama

देश

डच्चू मिळण्याची चर्चा अन् केंद्रीय मंत्र्यांना झाला राग अनावर..

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांनी याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एसआयटीच्या अहवालात हा पूर्वनियोजित कट समोर आल्यानंतर मंत्री अजय मिश्रा हे कारागृहात असलेल्या आशिषला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांना एसआयटीच्या अहवालाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी मिश्रा यांचा पारा चढला. त्यांनी पत्रकारांना चोर, असे संबोधले. काहीही प्रश्न काय विचारता, तुमचे डोके खराब झालेय का, असे म्हणत त्यांनी एका पत्रकाराचा माईक हिसकावून घेतला. त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्कीही केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मिश्रांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. यानुसार पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची निवड केली होती. ते या प्रकरणाच्या तपासावर दैनंदिन देखरेख ठेवून तपास पारदर्शक, निष्पक्ष आणि योग्य होईल, याची काळजी घेत आहेत. याचबरोबर या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने केला होता. यात एस.बी.शिरोडकर, दिपेंदरसिंह आणि पद्मजा चौहान या तिघांचा समावेश आहे.

आता एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यावर आता खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आता हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात येतील. याबाबत एसआयटीने या प्रकरणाच्या सुनावणी असणाऱ्या न्यायाधीशांसमोर अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT