Rajiv Ranjan Singh, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Caste Census : मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीबाबत केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट; तेव्हा राहुल गांधी गप्प का होते?

Rajanand More

New Delhi : संसद असो प्रचारसभा... सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वत्र जातनिहाय जनगणनेवर बोलत असतात. प्रत्येक सभा, पक्षाची बैठक, पत्रकार परिषदेत हा मुद्दा येतोच येतो. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी जोरकसमध्ये हा मुद्दा मांडला. पण त्याआधीच्या इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये या मुद्द्यावर ते गप्प बसायचे, असा गौप्यस्फोट आघाडीतील जुना सहकारी आणि आता एनडीएतील पक्षाने केला आहे.

संयुक्त जनता दलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी राहुल गांधीच्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीआधी सुरूवातीला इंडिया आघाडीचा पाया रचण्यात जेडीयूचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्वाचा वाटा होता. त्याआधीच काही महिने बिहारमध्ये जातनिहाय जनगणनाही झाली होती.

इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये बिहारप्रमाणेच देशभरात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडण्यात आला होता. याविषयी बोलताना राजीव रंजन सिंह म्हणाले, सध्या राहुल गांधी सर्वत्र जातनिहाय जनगणना व्हायला हवी, असे बोलतात. इंडिया आघाडीच्य मुंबई आणि बेंगलुरू येथे झालेल्या बैठकीत आम्ही तसा प्रस्ताव पारीत करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आम्ही आघाडीसोबत होतो.

आमच्या प्रस्तावावर राहुल गांधी गप्प होते. त्यावेळी ते का बोलले नाहीत, असा सवाल सिंह यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या दबावामुळे ते शांत बसले होते, असा आरोपही सिंह यांनी केला आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या अनेक बैठकांना हजेरी लावूनही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढली आणि भाजपला जोरदार टक्करही दिली.

सिंह यांनी राहुल गांधींवरही टीका केली. राहुल गांधी हे परिपक्व नेते नाही. त्यांना कसलेही गांभीर्य नाही. त्यामुळे हे काहीही बोलत असतात. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे ते नेते आहेत. त्यांनी परिपक्वता येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा टोला सिंह यांनी लगावला. 

दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जातनिहाय जनगणनेची जोरदार मागणी करण्यात आली होती. कारीही झाले तरी ही जनगणना व्हायलाच हवी, असे ते म्हणाले होते. आता जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणांतील प्रचार सभांमध्येही त्यांच्याकडून या मुद्द्यावर सातत्याने भाष्य केले जात आहे. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना त्याची दखल घ्यावी लागत आहे. हाच मुद्दा पुढे करत राहुल यांनी लोकसभेचे मैदानही गाजवले होते, हे विसरून चालणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT