UP Law Minister Brajesh Pathak meets families of BJP woker
UP Law Minister Brajesh Pathak meets families of BJP woker 
देश

लखीमपूर खीरीतील कार्यकर्त्याची 10 दिवसांनी भाजपला झाली आठवण

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला होता. अखेर 10 दिवसांनी भाजपला या कार्यकर्त्याची आठवण झाली आहे. उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी आज या कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली.

लखीमपूर खीरीत भाजप कार्यकर्ता शुभम मिश्रा आणि हरी ओम या मोटारचालकाचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी मिश्रा आणि हरी ओम यांच्या घरी आज भेट दिली. दोघांच्याही नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. लखीमपूर खीरीत 3 ऑक्टोबरला हिंसाचार झाला होता. त्यानंतर आज 10 दिवसांनी अखेर हा घटनेत ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्याची दखल घेतली आहे. या वेळी बोलताना ब्रजेश पाठक म्हणाले की, लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचारामागे असलेल्यांना शिक्षा करण्यात येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने विरोधी पक्षांनी राजकारण करू नये.

या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक झाली आहे. न्यायालयाने आशिष याला 11 ऑक्टोबरला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्याला काल उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले. तेथे त्याची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) आशिषची चौकशी केली. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली हे 9 सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT