Indian and Chinese army in Galwan Valley
Indian and Chinese army in Galwan Valley  Sarkarnama
देश

भारताची खोडी काढून चीन तोंडघशी; अमेरिकेने थेट तंबीच दिली

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीनच्या (China) सैन्यात गल्वान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आता चीनने पुन्हा भारताची खोडी काढली आहे. गल्वान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या अधिकाऱ्याला चीनने हिवाळी ऑलिंपिकचा (Olympic) 'टॉर्चबेअरर' बनवल्याचे समोर आले आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. यावरून अमेरिकेने (USA) थेट चीनला तंबी दिली आहे.

चिनी सैन्यातील कमांडर दर्जाचा क्वि फाबाओ हा अधिकारी गल्वान खोऱ्यातील संघर्षात गंभीर जखमी झाला होता. चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक होत असून, यासाठी नेमकी याच अधिकाऱ्याची टॉर्चबेअरर म्हणून निवड करण्यात आली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शिनजियांग येथील सैन्य मुख्यालयात तो नियुक्तीस आहे. त्याने चारवेळा ऑलिंपिक चॅम्पियन असलेल्या वँग मेंग यांच्याकडून ऑलिंपिकची ज्योत स्वीकारली, असे वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे. यातून एकप्रकारे चीनने भारताच्या जखमेवर मीठ चोळल्याचे मानले जात आहे. यावर भारत सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र संबंध समितीने याची गंभीर दखल घेतली. चीनच्या या कृतीचा समितीने निषेधही केला आहे. समितीचे सदस्य जिम रिश्च यांनी म्हटले आहे की, ऑलिंपिक 2022 साठी टॉर्चबेअरर म्हणून भारतावर हल्ला करण्यास सहभागी असलेल्या अधिकाऱ्याची निवड चीनने केली आहे. ही चीनची कृती अपमानास्पद आहे. याचबरोबर उईगूर मुस्लिमांचा वंशच्छेद चीनकडून सुरू आहे. उईगूर मुस्लिमांचे स्वातंत्र्य आणि भारताचे सार्वभौमत्व यांना अमेरिकेचा कायम पाठिंबा असेल.

पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन संघर्ष झाला होता. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले होते मात्र, गोळीबार झालेला नव्हता. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जून 2020 रोजी रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 अधिकारी व जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंकडून गोळीबार झालेला नव्हता.

गल्वानमध्ये त्यांचे नेमके किती सैनिकी मारले गेले याचा माहिती चीनने सुरवातीला दिली नव्हती. पण नंतर गल्वानमध्ये ठार झालेल्या सैनिकांचा मरणोत्तर गौरव करुन चीनने याची कबुली दिली होती. गल्वानमध्ये ठार झालेल्या 4 सैनिकांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे. याचबरोबर या संघर्षात गंभीर जखमी झालेल्या कर्नलचाही सन्मान करण्यात आला होता. भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना प्रथमच गल्वानमध्ये घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT