Syed Naseer Hussain In Rajya Sabha sarkarnama
देश

Waqf Amendment Bill : 'जर रेल्वेमध्ये नमाज अदा केली तर ती आमची होते का?', वक्फवरून राज्यसभेत खडाजंगी, काँग्रेसचा खासदार भडकला

Syed Naseer Hussain In Rajya Sabha : वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत काही सुधारणांसह पास झाले असून आता ते राज्यसभेत मांडले आहे. लोकसभेत हे विधेयक 288 विरूद्ध 232 मतांनी पास झाले आहे.

Aslam Shanedivan

Navi Delhi : अख्या देशासह जगाचे लक्ष हे वक्फ दुरुस्ती विधेयकाकडे लागले असून ते लोकसभेत मंगळवारी (ता.2) मंजूर झाले. काही सुधारणांसह हे विधेयक मंजूर झाले असून या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली आहेत. आता हे विधेयक वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेत मंजूरीसाठी पाठवण्यात आले आहे. यावेळी देशाचे कायदामंत्री किरण रिजिजू वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर राज्यसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाना साधताना काही सवाल करत सत्ताधारी करत असलेले मुद्देच चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. वक्फमध्ये कोणत्याही गैर-मुस्लिमकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही या किरण रिजिजू यांच्या आश्वासनानंतर कर्नाटकचे काँग्रेस खासदार डॉ सय्यद नसीर हुसैन यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी, 1995 चे विधेयक आणि 2013 च्या दुरुस्तीवरून लोकसभेत गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. तसेच यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांना आम्ही विचारू इच्छितो की, दोन्ही वेळी भाजपने या विधेयकाला का समर्थन दिलं होतं. 2009 मध्ये तर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रहमान खान समितीच्या अहवालाची तपासणी करू असा मुद्दा घातला होता. त्या आश्वासनाचे काय झाले. उलट आता हेच भाजपवाले रहमान खान आणि सच्चर समितीच्या अहवालाच्या आधारे 2013 चे मांडण्यात आलेल्या विधेयकाचा अपमान करत आहेत. जर त्यावेळी हे विधेयक एखाद्या समाजाला खूश करणारे होते. तर मग त्याला समर्थन का दिले? असाही सवाल हुसैन यांनी केला आहे.

हुसेन यांनी, हे विधेयक पूर्णपणे कथित गोष्टींवर आधारित आहे. गेल्या महिन्याभरापासून यासाठी भाजप झटत आहे. हे विधेयक भाजपसाठी फक्त ध्रुवीकरणाचे साधन आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार जर गरिबांना सत्ता देऊ आणि पारदर्शकता आणू असे असेल तर मग 10 वर्ष सत्तेत राहून भाजपने काय केलं? एक केंद्रीय वक्फ परिषद असून त्यात कोणतीही सदस्य नाही. फक्त किरण रिजिजू यांचेच नाव दिसत असल्याचा दावा हुसेन यांनी केला आहे.

तर भाजपशासित राज्यांमध्ये कोणतेही बोर्ड नसून देशाची दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी येथे आणल्या जातायत. जेपीसीचा सदस्य मीही होतो. जेव्हा ते सुरू झाले आणि तज्ज्ञ येऊ लागले, तेव्हा 97 टक्के लोकांनी विधेयकाविरुद्ध आवाज उठवला. आता हे एक लाखाचा आकडा पटलावर ठेवत असून भाजपने आधी या विधेयकाला किती लोकांनी विरोध केलाय याचीही आकडा द्यावा असेही आवाहन हुसेन यांनी केला आहे.

पहिल्यांदाच, जेपीसीमध्ये गैर-मुस्लिमांना बोलावण्यात आले. काही जण जातीयवादी विधाने करत होते. तर काही जेपीसीच्या शिफारशींवरून आम्ही आलो असे म्हणत होते. मला आनंद आहे की पहिल्यांदा हे विधेयक कलम शिफारशींद्वारे आणले गेले असून कलम बुलडोझर केले गेले नाही. या जेपीसीच्या शिफारशी नसून त्या एनडीए खासदारांच्या आहेत. जेपीसी स्थापन व्हायला नकोच होती. जेपीसीला पाठवल्यानंतर पुढील आवृत्त्या बनवण्यात आल्या आहेत. आणलेल्या सर्व दुरुस्त्या संविधानाच्या विरोधात आहेत. तर भाजपला मुस्मिल समाजाला दुय्यम दर्जा द्यायचा असून त्यांना ते दुसऱ्या दर्जाचे नागरिक असल्याचे दाखवून द्यायचे आहेत.

वक्फ विधेयकाबाबत गोंधळ

भाजपला या देशात खोदकाम करून काय सापडणार आहे हे माहित नाही. यामध्येही यासाठी तरतूद करण्यात आली होती. रिजिजूजींनी वक्फचा अर्थ स्पष्ट केला, वक्फचा अर्थ असा आहे की कोणीही कोणालाही देऊ शकणारे दान. मोहम्मद पैगंबर यांच्या काळात, बिगर मुस्लिम देखील देणग्या देत असत. दानधर्माची संकल्पना प्रत्येक धर्मात आहे. याच देणग्यांची माहिती असावी म्हणूनत वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली. या देशात एसजीपीसी आणि मंदिर ट्रस्ट आहेत, जे गोंधळ पसरवत आहेत? पण हे असं का करत आहेत? वक्फ कायदा ब्रिटिश काळात लागू करण्यात आला आणि त्यात सुधारणा करण्यासाठी अनेक विधेयक आणण्यात आली. काँग्रेसच्या काळात आलेल्या विधेयकांना भाजपने मग का पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा दिला हे देखील विचार करण्याची बाब आहे, असेही हुसेन यांनी म्हटलं आहे.

वक्फ बोर्डाविरुद्ध पसरवलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे वक्फ बोर्ड कोणतीही जमीन स्वतःची म्हणून घोषित करतो. जर आम्ही ट्रेनमध्ये नमाज अदा केली तर ट्रेन आमची होते का? यामुळे वक्फबाबत केले जाणारे दावे चुकीचे असून गैरसमज पसरवले जातायत. काही अडचणी असल्यास न्यायालयातही जाता येतं मात्र भाजपवाले न्यायालयात जाऊ शकत नसल्याचेही म्हणत असून आता या विधेयकामुळे जाता येतं असं म्हणत आहेत. पण यापूर्वी अशी प्रकरणं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही गेली आहेत.

मुस्लिमांसाठी वेगळे मंत्रालय

यावेळी हुसेन यांनी, यातील पाच वर्षांच्या धार्मिक कालावधीवरून सवाल करताना, आता हे ठरवणारे तुम्ही कोण? आता दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जातेय की नाही. हे देखील कोण ठरवणार? की दाढी ठेवणे, टोपी घालण्यासाठी त्यांच्या दिनचर्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहात. की आता त्याला तो मुस्लिम धर्माचे पालन करतो म्हणून प्रमाणपत्रे देण्यासाठी वेगळा विभाग निर्माण करणार आहात. त्या प्रमाणपत्रावर देखील आता मोदीजींचा फोटो असेल का? असे सवाल केले आहेत.

व्होट बँकेचे राजकारण

तर भाजपला फक्त दंगली घडवून आणण्यासाठी वाद निर्माण करायचा आहे. जेणेकरून त्यांची व्होट बँक वाढत राहील. ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. तुम्ही तुमच्या संस्था चालवण्यास सक्षम नाही का? तुम्हाला आम्हाला दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवायचे आहे का? तुम्ही आम्हाला हिंदू संस्थांमध्ये स्थान द्याल का? असेही सवाल हुसेन यांनी गैरसमज पसरवणे थांबवा असे आवाहन केले आहे.

SCROLL FOR NEXT