West Bengal Rajya Sabha election BJP candidates Sarkarnama
देश

BJP Politics: TMC सोडून BJPमध्ये प्रवेश केलेल्या तीनही खासदारांना काही तासांतच राज्यसभेची उमेदवारी जाहीर

BJP Rajya Sabha candidates: तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बराइक यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Mangesh Mahale

West Bengal Rajya Sabha election: पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या तीन रिक्त जागांसाठी भाजपने मोठा राजकीय डाव खेळला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बराइक यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या तिघांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. गुरुवारी रात्री भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली.

या तिन्ही नेत्यांनी गुरुवारी (ता. 9) दुपारी टीएमसीचा राजीनामा देतानाच राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या तीन जागांसाठी 24 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानले जात होते. कारण या जागांवर टीएमसीच्या बंडखोर गटाने उमेदवार दिलेला नाही, तर इतर पक्षांकडेही आवश्यक संख्याबळ नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राजीनाम्यामागे काय आहे रणनीती?

सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बराइक हे यापूर्वीही राज्यसभेचे सदस्य होते. मात्र, टीएमसीचा राजीनामा देऊन भाजपकडून पुन्हा राज्यसभेत जाण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ पक्षबदल नसून, भाजपच्या व्यापक संसदीय रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चे संख्याबळ वाढवून भविष्यातील महत्त्वाची विधेयके सहज मंजूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेतील संख्याबळावर लक्ष

या तीन जागांवर विजय मिळाल्यास राज्यसभेत एनडीएचे एकूण संख्याबळ 154 पर्यंत पोहोचू शकते. सध्या भाजपचे 114 सदस्य आहेत, तर एनडीएकडे एकूण 151 सदस्यांचे समर्थन असल्याचे सांगितले जाते. राज्यसभेत दोन-तृतीयांश बहुमतासाठी 163 सदस्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या विजयांनंतर एनडीए हे लक्ष्य गाठण्यापासून केवळ नऊ जागा दूर राहील.

दुसरीकडे, विरोधी INDIA आघाडीचे संख्याबळ 64 सदस्यांवर आले आहे. याशिवाय काही पक्ष कोणत्याही आघाडीचा भाग नसल्याने भविष्यातील महत्त्वाच्या मतदानावेळी त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

दोन-तृतीयांश बहुमत का महत्त्वाचे?

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 नुसार संविधानात दुरुस्ती करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत विशेष बहुमत आवश्यक असते. म्हणजेच, सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येतील बहुमतासह उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळणे बंधनकारक असते. याच कारणामुळे राज्यसभेत संख्याबळ वाढवण्यावर भाजपचा विशेष भर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT