BJP
BJP 
देश

भाजपला धक्का; आणखी एका आमदाराची सोडचिठ्ठी

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये भाजपमधील आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. आमदार, खासदारांसह अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रामराम ठोकला आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. ही रांग अद्याप संपलेली नसून तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका आमदाराने भाजपला रामराम केला आहे.

रायगंज मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कृष्णा कल्याणी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा शुक्रवारी केली. भाजपने त्यांना गुरूवारीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षाच्या खासदार व माजी केंद्रीय मंत्री देबश्री चौधरी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कल्याणी यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

कल्याणी म्हणाले, 'देबश्री चौधरी यांच्याकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या ज्या पक्षात असतील त्या पक्षात मी काम करू शकत नाही.' कल्याणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे कोणत्या पक्षात जाणार किंवा नाही, याबाबत स्पष्ट केलेलं नाही. पण ते तृणमूलमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कल्याणी यांनी मागील महिन्यात पक्ष नेतृत्वाला पक्ष सोडण्याबाबतचा इशारा दिला होता.

मागील महिन्यात बोलताना त्यांनी जे नेते पक्ष सोडत आहेत, त्यांच्या तक्रारींनी पक्षाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही, असं सांगितलं होतं. मी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांतून अंग काढून घेतलं आहे. तसेच केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी डेडलाईन दिली आहे, असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. भवानीपूरसह तीन मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपला धक्का बसला आहे.

दरम्यान, कल्याणी यांच्याआधी भाजपचे खासदार बाबुल सुप्रिया यांनी भाजपला धक्का देत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच आमदार मुकूल रॉय यांच्यासह चार भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ कमी होत चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच, खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT