Mamata Banerjee News
Mamata Banerjee News Sarkarnama
देश

Mamata Banerjee News : ''...पण भीक मागायला मी कधीही मोदी सरकारकडे जाणार नाही''; ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Kolkata News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्याकडून सातत्यानं केंद्र सरकार पश्चिम बंगालसह भाजप विरोधी राज्यांसोबत दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात येतो. आता पुन्हा एकदा बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना गरज पडली तर मी बंगालच्या मातांसमोर भीक मागेन, पण भीक मागायला कधीही दिल्लीतल्या मोदी सरकारकडे जाणार नसल्याचं स्पष्ट करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य योजनांसाठी केंद्राकडून बंगाल सरकार (West Bengal )ला निधी मिळत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. याच मुद्द्यांवरुन यापूर्वी त्यांनी 29-30 मार्च रोजी त्यांनी कोलकाता येथे दोन दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं.

ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) गुरुवारी कोलकाता येथे एका जाहीर सभेसाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ममता यांनी बंगाल सरकारला निधी न दिल्याचा आरोप केंद्रावर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातही मनरेगा आणि गृहनिर्माण योजनेसाठी आम्हाला एक रुपयाही देण्यात आलेला नाही असं ममता म्हणाल्या.

बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या?

राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्हाला 2024 पर्यंत निधी मिळणार नाही असे ऐकायला मिळत आहे. असे झाले तर गरज पडली तर मी बंगालच्या मातांसमोर भीक मागेन, पण कधीही भीक मागायला दिल्लीत जाणार नाही.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपच्या राजवटीत केंद्रीय एजन्सीद्वारे विरोधकांना सतत त्रास दिला जातो, परंतु, विरोधी पक्षाच्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करताच तो निर्दोष ठरतो. ही भाजपच्या वॉशिंग मशिनची जादू असल्याची उपरोधिक टीका करतानाच भाजप ढोंगी आहे असल्याचंही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकार(Modi Government) सर्वसामान्यांचा पैसा रोखून धरत असल्याची टीका ममतांनी केली होती. बंगालमधील लोकांच्या रोजगाराचा पैसा केंद्राला परत करावा लागेल. गॅसच्या किंमती वाढत असल्याचे ममता म्हणाल्या होत्या. त्यामुळे मी दोन दिवस धरणे धरणार आहे असे त्या म्हणाल्या होत्या.

केंद्राकडं राज्याचे सात हजार कोटी रुपये...

केंद्र सरकारकडं पश्चिम बंगालचे सात हजार कोटी रुपये देणं बाकी आहे. यापूर्वीची थकबाकीही सरकारने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. 55 लाख घरांच्या बांधकामासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. 12 हजार गावांमधील खराब रस्त्यांची दुरुस्ती आम्ही करत आहोत. हे सर्व राज्याच्याच पैशाने करत आहे. केंद्राकडून 100 दिवसांचे काम, रस्ता, घरे यासाठी 1 लाख 15 हजार कोटी रुपये मिळतात.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT