TMC latest news : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव, निवडणुकीच्या निकालानंतर झालेला हिंसाचार तसेच अधिकारी यांच्या पीएच्या हत्येवरून आता भाजपसोबतच टीएमसीतील नेत्यांनीही माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
तृणमूलचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी निकालानंतर लगेच अभिषेक बॅनर्जी आणि निवडणुकीचे कामकाज पाहणाऱ्या आय-पॅक संस्थेवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना लगेच कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. आता दत्ता यांनी खळबळजनक दावा केला आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना दत्ता यांनी म्हटले आहे की, सुवेंदू अधिकारी हे केवळ दोन दिवसांपासून मुख्यमंत्री आहे. पण या दोन दिवसांतच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सुमारे ५ हजार कार्यकर्त्यांचा जीव वाचविला आहे. त्यांच्या पीएची ६ मे रोजी हत्या झाली. सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये बदला घेतला जाईल, असे म्हटले असते तरी त्या रात्री कमीत कमी ५ हजार तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली असती.
दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले की, कुणीही हातात कायदा घेऊ नये. आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असे म्हणत सुवेंदू अधिकारी यांनी परिस्थिती सावरली. त्यासाठी मी त्यांना सलाम करतो, असे दत्ता यांनी म्हटले आहे. दरम्यान, दत्ता यांनी आय-पॅक संस्थेने आपल्याकडे उमेदवारीसाठी ५० लाख रुपये मागितल्याचा आरोपही केला आहे. पण दबावामुळे आपण कुणालाही काही सांगितले नाही, असेही ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेसच्या पराभवाची तीन कारणे सांगताना दत्ता म्हणाले, पहिले कारण म्हणजे आय-पॅक. मागील सहा महिन्यांपासून आय-पॅककडून पक्ष चालविला जात होता. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या वडिलांना बदनाम करा, असे सांगणारे मेसेज आम्हाला पाठविले जात होते. दुसरे कारण म्हणजे भ्रष्टाचार. पक्षातील खालच्या स्तरावरील केडरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता. तसेच लोकांनाही प्रचंड त्रास दिला जात होता. महिलांना सन्मान न देणे, हे तिसरे कारण ठरले. महिला दीदींच्यामागे उभ्या राहतील, असा आत्मविश्वास होता. पण तसे झाले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.