पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चर्चा रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेससमोर अंतर्गत संघर्षाचे आव्हान उभे राहिले असून पक्षातील नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही परिस्थिती चिंतेची मानली जात आहे.
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यानंतर पक्षातील 58 आमदारांनी स्वतंत्र भूमिका घेत बंडखोर गटाची साथ दिली. या गटाचे नेतृत्व संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी करत असल्याचे सांगितले जात आहे. बंडखोर आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून घोषित केले असून त्यांना अध्यक्षांची मान्यताही मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता केवळ आमदारच नव्हे तर खासदारांमध्येही अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात तृणमूल काँग्रेसचे तब्बल 23 खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यातील काही खासदार भविष्यात वेगळी राजकीय दिशा स्वीकारू शकतात, अशा चर्चांनी वेग घेतला आहे.
कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना ऋतब्रत बॅनर्जी यांनी या चर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांत कोणत्याही खासदाराशी थेट चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुढील काळात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील काही खासदार नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आमदारांप्रमाणेच खासदारांचाही स्वतंत्र गट तयार होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे 28 खासदार असून संभाव्य गटाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ महत्त्वाचे ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्षातील वाढती नाराजी, बंडखोरीची शक्यता आणि आगामी राजकीय रणनीती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील पुढील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.