West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला असून भाजपची सत्ता आली आहे. यानंतर गेल्या दोन महिन्यांत ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून महाराष्ट्राप्रमाणेच त्यांच्या पक्षावरही बंडखोर आमदारांनी दावा केला आहे. या सर्व घडामोडींमुळे एकीकडे ममता बॅनर्जी अडचणीत आल्या असतानाच त्यांना मोठा दिलासा देणारे वक्तव्य समोर आले आहे. ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी याबाबत भाष्य केले असून तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाकडून पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये राजकीय डाव फिरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर येथे भाजप सत्तेत आली. एकीकडे पश्चिम बंगालची सत्ता तृणमूल काँग्रेसच्या हातातून जाताच येथे ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला. आधी त्यांच्या आमदारांचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला. या झटक्यातून त्या सावरतात न सावरतात, तोच त्यांच्या 20 खासदारांनी बंडखोरी करत त्यांचे नेतृत्व नाकारले.
या घडामोडीतच ममता बॅनर्जी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करतील, अशा चर्चा सुरू झाल्या. यातच रविवारी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी रविवारी बंडखोरांच्या गटात प्रवेश केला. पण याच वेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. ज्यामुळे आता पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना आणि तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडाला नवे वळण मिळाले आहे.
रवींद्रनाथ घोष हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून माजी मंत्री आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या गटात प्रवेश केला. यानंतर ते म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांनी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना सक्रिय राजकारणातून दूर केले, तर नाराज नेते आणि कार्यकर्ते पुन्हा पक्षात परतण्यास तयार आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे राजकीय अनुभवाची कमतरता असून त्यांच्यामुळेच पक्षाला फटका बसला आहे. त्यांनी मनमानी करत 80 हून अधिक विद्यमान आमदार आणि मंत्र्यांची तिकिटे कापली आहेत. तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना संघटनात्मक पदांवरून हटवले आहे. यामुळे पक्षावर त्याचा परिणाम झाला आहे.
पण जर ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले, तर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केलेल्या अनेक नेत्यांकडून पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल. तसेच ते पुन्हा पक्षात परततील.
या घडामोडींवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, टीएमसी दोन जहाजांमध्ये विभागली गेली असून दोन्ही जहाजे आता बुडत आहेत. त्यामुळे कोणत्या जहाजात बसायचे, हा त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.