Parliament Special Session : Sarkarnama
देश

Parliament Special Session : 'मी पहिल्यांदा संसदेत आलो तेव्हा...; संसदेच्या आठवणीत मोदी भावुक

Parliament Session : संसदेचे पाचदिवसीय अधिवेशन आजपासून सुरू झाले.

अनुराधा धावडे

जेव्हा मी पहिल्यांदा संसद सदस्य झालो आणि पहिल्यांदा खासदार म्हणून या इमारतीत प्रवेश केला. तेव्हा सहजच मी संसद भवनाच्या उंबरठ्यावर डोके टेकवले. लोकशाहीच्या या मंदिरात पाय ठेवताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या एका मुलाचा देश इतका सन्मान करेल, याची मी कल्पनाही केली नव्हती,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संसदेचे पाचदिवसीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. केंद्र सरकारच्या अजेंड्यानुसार एकूण आठ विधेयके मांडली जाणार आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीचे विधेयक प्रमुख आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीला बोलताना पंतप्रधानांनी जुन्या संसद भवनाचा इतिहास सांगितला. नरेंद्र मोदी म्हणाले, 'ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता, पण नव्या संसदेच्या इमारतीच्या बांधकामासाठी माझ्या देशवासीयांनी कष्ट घेतले आहेत. नव्या इमारतीच्या बांधकामासाठी देशवासीयांचा घाम आणि कष्ट आहेत. त्याच्या उभारणीत देशाचा घाम गाळला गेला. आज आम्ही या ऐतिहासिक वास्तूला निरोप देत आहोत. पण जुने संसद भवन कायम आमच्यासाठी प्रेरणास्थान राहील. हे भवन आपल्या सर्वांचा वारसा आहे.

75 वर्षात येथे अनेक स्वप्ने साकार झाली आहेत. या काळात 600 महिलांनी या सदनाची प्रतिष्ठा वाढवली आहे. संसदेत दलित, आदिवासी आणि महिलांचे योगदान वाढले. महिलांनी या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली. संसदेत त्यांचे मोठे योगदान आहे. विधानसभेत आतापर्यंत साडेसात हजारांहून अधिक खासदारांचे योगदान दिले असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, 'संसद भवनाचा निरोप घेणे हा खूप भावनिक क्षण असतो एखादे कुटुंब जुने घर सोडून नवीन घरात गेले तर अनेक आठवणी काही क्षणांसाठी हृदय पिळवटून टाकतात. हे भवन सोडताना आपले मन भरून येते. त्या भावना, त्या आठवणींनी भरलेली आहे. हे संसद भवन अनेक आठवणींनी भरलेले आहे. उत्सव, उत्साह, आंबट गोड क्षण, भांडणे या आठवणींनी हे संसद भवन भरलेले आहे. (Sansad Adhiveshan)

याचवेळी त्यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणीही ताज्या केल्या. "पंडित नेहरूंचे 'अॅट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट...' हे भाषण आपल्या सर्वांना प्रेरणा देते. याच सभागृहात अटलजी म्हणाले होते, 'सरकार येतील आणि जातील, पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश असाच राहिला पाहिजे. अशा आठवणीही त्यांनी ताज्या केल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT