Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar, Udayanraje Bhosale sarkarnama
कोल्हापूर

जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं... उदयनराजेंची टीका

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : ''या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर'' असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. येथे भाजपाने आपली ताकद पणाला लावली असून महाविकास आघाडीने देखील पंढरपूरच्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाविषयी उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर.''

यावेळी उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ''हे पंचायतराजची संकल्पना सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केलं काँग्रेस-राष्ट्रवादीने, असा प्रश्न करून ते म्हणाले, ''सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरलं. याला गुलामगिरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उदयनराजे म्हणाले, ''याआधी महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले. देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली होती. त्यावेळी शिवसेनाबरोबर होती. मग असं काय घडलं की त्यांनी पार चिरफाड करून टाकली'' ''आज काय अवस्था आहे? कोण भोगतंय? कुणामुळे? आज जे सत्तेत आहेत, त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्यांचाच विसर पडलाय. कारण ते आपली सत्ता टिकवण्याच्याच मागे आहेत.

''कोण इकडे जाईल का? कोण तिकडे जाईल का? प्रगतीचा विचार येणारच कसा? मग यातून अस्थिरता वाढत गेली.'' अशा शब्दांत उदयनराजेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ''याचा परिणाम कुणाला भोगायला लागतो, तुमच्या-आमच्या कुटुंबातल्या तरुणांवर परिणाम होतो. त्यांची प्रगती थांबते. बारकाईने आपण विचार करायला हवा… सत्ता कुणाचीही असो. लोकांच्या प्रगतीवर गदा अजिबात येता कामा नये,'' असे ही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT