Chandrakant Patil, Satej Patil
Chandrakant Patil, Satej Patil sarkarnama
कोल्हापूर

तुम्ही ५० वर्षांचा हिशोब द्या... मी पाच वर्षांचा देतो; चंद्रकांतदादांचे काँग्रेसला आव्हान...

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरकरांना पहायला सुद्धा मिळाले नाही. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम फुटभरही झाले नाही. पूरग्रस्तांना दमडीसुद्धा मिळाली नाही. तुम्ही टोलची पावती फाडली आम्ही टोलमाफ केला. राज्यात ५० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. कोल्हापूरसाठी काँग्रेसने काय केले, याचा हिशोब बिंदू चौकात जाहीरपणे द्या. आम्ही भाजपच्या पाच वर्षांच्या काळात काय केले, याचा हिशोब देतो, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सत्यजीत कदम यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. उद्योगभवन समोरील रस्त्यावर ही सभा झाली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ''राज्यात ५० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. महापालिकेची सुत्रेही काँग्रेसकडेच आहेत. मात्र, कोल्हापुरकरांच्या समस्या तशाच आहेत. थेट पाईपलाईन योजना पूर्ण केली नाही तर सतेज पाटील राजीनामा देणार होते. थेटपाईप लाईनचे पाणी अजून बघायलाही मिळाले नाही.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम रखडलेलेच आहे. टोलची पावती फाडून तुम्ही कोल्हापुरकरांच्या डोक्यावर एक प्रकारचा झिजीया कर लावला. देवेंद्र फडणवीसांनी ४७५ कोटी रुपये एक रक्कमी देऊन या टोलमधून जनतेची सुटका केली. विमानतळासाठी केंद्र सरकारने २७३ कोटी तर देवेंद्र फडणवीसांनी ८० कोटी रुपये दिले. अमल महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून विमानतळाचे विस्तारीकरण झाले. आज येथे देशातील विविध शहरातून विमाने येतात.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणारी नृसिंहवाडी, जोतिबा, अंबाबाई मंदिर यांच्या विकासासाठी भाजपच्या काळात निधी दिला गेला. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने कोणतेही विकास काम जिल्ह्यात केले नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारे राजू शेट्टी म्हणातात महापुरग्रस्तांना मदत देण्यासाठी फडवणवीसांनी २०१९ मध्ये लागू केलेला शासन आदेश लागू करा. त्यामुळे कोल्हापुरच्या जनतेने भाजपच्या उमेदवाराला विजयी करून पुन्हा विकासाची नवी सुरुवात करावी.''

धनंजय महाडिक म्हणाले, ''सगळी सत्ता आपल्या हाती एकवटी पहिजे असे काही जणांना वाटते. त्यातूनच गोकूळ माझ्याकडेच, जिल्हा बँकेवर माझीच सत्ता, पालकमंत्री मीच, आमदारकी माझ्याच घरात असे सगळे त्यांना पाहिजे. सगळे आमदार त्यांना रिमोटवरचे लागतात. मी कोल्हापुरकरांना हात जोडून विनंती करतो की कोल्हापुरच्या हितासाठी संघर्ष करणारा आमदार पाहिजे. म्हणून सत्यजीत कदम यांना निवडून द्या.''

यावेळी माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हिंदुराव शेळके, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहंकाराला धुळीस मिळवा..

पालकमंत्री सतेज पाटील हे अहंकारी आहेत. त्यांना निरंकुश सत्ता पाहिजे. पण, कोल्हापुरकरांना अहंकार चालत नाही. भाजपच्या सत्यजित कदम यांना निवडून देऊन हा अहंकार धुळीस मिळवा, असे आवाहन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

आधी राष्ट्रवाद शिका...

भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस रोज शाहु, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. पण, मराठा समाजाचे आरक्षण तुमच्यामुळे रद्द झाले. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. देशद्रोहाचा गुन्हा असणाऱ्या नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ तुम्ही रस्त्यावर येता. हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का, आधी राष्ट्रवाद शिका मग राष्ट्रवादी नाव लावा.''

कोल्हापूर कोणाचे बटीक नाही

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ''कोल्हापूर जिल्हा कोणाचा बटीक नाही. सत्तेच्या जोरावर कोणी जिल्ह्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न करणार असेल तर इथली जनता त्याच्या चिंध्या केल्याशिवाय राहाणार नाही. जिल्ह्यातील उद्योजकांना कमी दरात वीज मिळावी. इथल्या झोपडपट्ट्यांचा विकास व्हावा हे आण्णांचे स्वप्न होते. मात्र, काँग्रेसनेच त्यांच्या स्वप्नांना तिलांजली दिली.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT