Minister Aditi Tatkare Sarkarnama
महाराष्ट्र

Aditi Tatkare : महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’! जबाबदारी नसेल, तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Congress Harshwardhan Sapkal slams Women and Child Development Minister Aditi Tatkare over rising concerns of women safety, citing the Nashik Ashok Kharat case : राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासह महिलांच्या सुरक्षिततेवरून काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री आदिती तटकरेंना चांगलच सुनावलं आहे.

Pradeep Pendhare

women safety Maharashtra : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राची देशपातळीवर अब्रूचे धिंडवडे निघालेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, शोषण रोखण्यासाठी महायुतीमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय काम करत आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला आहे.

काँग्रेस (Congress) हर्षवर्धन सपकाळ यांनी, एक्सवर पोस्ट करत, मंत्री आदिती तटकरे यांच्यावर घणाघात केला. काही काम नसेल, तर राजीनामा देऊन घरी बसा, अशा शब्दात सुनावले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी समाज माध्यमांवरून मंत्री तटकरे यांना डिवचलं असल्याने, त्यावर सत्ताधाऱ्यांकडून कशापद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं, विशेष करून आदिती तटकरे काय रिअॅक्शन देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी, आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचा महिला आणि बालविकास मंत्री यांचा फोटो शेअर करत, या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना! आदिती तटकरे! राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत, याकडे वेधलं.

'मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्या अंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, पुण्यातील हृषीकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो. रोज राज्यातील महिला भगिणींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणं समोर येत आहेत. पण, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत,' असा घणाघात सपकाळ यांनी केला आहे.

'या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्या अंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय? याबाबत राज्यातील पोलिस महासंचालकांना त्या भेटल्यात का? राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का?' अशा प्रश्नांचा भडिमार सपकाळ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना, जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे, हेच समजत नसेल, तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उबवू नये, असा टोला देखील लगावला आहे.

SCROLL FOR NEXT