rahul gandhi sharad pawar uddhav thackeray.jpg sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi News : ऐका हो ऐका... काँग्रेसचे 75 आमदार निवडून येणार; ठाकरे, पवारांचे काय होणार?

Dnyanesh Savant

Mumbai News : लोकसभेला ‘जादू’ करून दाखवलेल्या काँग्रेसला आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही आपलाच करिष्मा राहणार असल्याचा ‘कॉन्फिडन्स’ आहे. या निवडणुकीत काही झाल्या, काँग्रेसचाच ‘सीएम’ होणार असल्याची खात्री पटलेल्या पक्षाच्या ‘हायकमांड’ने जोरदार तयारी चालवली आहे.

राज्याचा निवडणूक मूड जाणून घेऊन, जिंकण्यासाठी लढण्याच्या हेतूने हायकमांडने राज्यभरातील 288 मतदारसंघात मोठा सर्व्हे केला आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या ( Congress ) पहिल्यावहिल्या सर्व्हेत पक्षाला खरोखरीच ‘अच्छे दिन’ येणार असून, या निवडणुकीत 75 आमदार निवडून येण्याचा अंदाज सर्व्हेतून आला आहे. या सर्व्हेनंतर लगेचच दुसऱ्या सर्व्हेला सुरवात केली असून, ज्यामुळे पक्षाचा नेमका कोणता उमेदवार निवडून येईल, याचाही अभ्यास केला जाणार आहे. पहिला सर्व्हे आपल्याच बाजूनं असल्याने काँग्रेस आता ‘शहाण्या’सारखी पावले टाकणार आहे.

म्हणजे, जागावाटपातही काँग्रेस मित्रपक्ष ठाकरेंची शिवसेना ( Shivsena ), पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीसोबत ( Ncp ) समजूतदारपणा दाखविणार असल्याचे समजते. दुसरीकडे, जागावाटप ठरले नसले; तरीही पक्षाने राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मोठी बैठक घेतली. ज्यामध्ये संघटनेतील जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाचे पदाधिकारी होते. केंद्र आणि राज्यात मोदींचा झंझावात आल्यापासून केवळ दाखविण्यापुरते निवडणुका लढणाऱ्या काँग्रेसनं आता सगळ्याच निवडणुका मनावर घेतल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात 288 मधील सर्वाधिक मतदारसंघ आपल्याकडे घेऊन काँग्रेस, ठाकरे आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला अंतर्गत धक्का देऊ तयारीत आहे. साहजिकच सर्वाधिक आमदारांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्रिपदासह सत्तेत मोठा वाटा मिळवण्याचा काँग्रेसचा डाव असू शकतो.

एरवी एकमेकांना पाण्यात पाहून पक्ष पाण्यात गेला; तरीही ‘मी म्हणेन ती पूर्वदिशा’म्हणणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आता खरोखरीच एकदिलाने काम करीत आहेत. भाजपला हरविण्यासाठी या बड्या नेत्यांनीही वज्रमूठ केल्याने काँग्रेस निवडणुकीत भारी ठरण्याची चिन्हे आहेत.

लोकसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सलग दारुण पराभव झालेली काँग्रेस महाराष्ट्रातही तोळामासाचीच राहिली. तरीही, विधानसभेच्या 2019 च्या पक्षाचे 44 आमदार निवडून आले. त्यानंतर राज्यात पक्ष वाढण्याच्या दृष्टीने फार काही घडले नाही. मात्र, लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसनं मुसंडी मारली आणि आघाडीत सर्वाधिक 14 खासदार निवडून आले. त्यामुळे पुन्हा ‘मीच मोठा भाऊ’ अशा थाटात काँग्रेस नेते वागू लागले आहेत. अशा वागण्याने पक्षाचे नेहमीच अतोनात नुकसान झाले. हे आजवर ना दिल्ली ना राज्यातील नेतृत्वाला कळून चुकले.

सत्तेबाहेर फारसे न राहिलेल्या पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना गेल्या 8-10 वर्षांत अद्दल घडली. लोकसभा निवडणुकीत गटबाजी न अडकता काँग्रेस जागावाटप केले, त्यानंतर हेरून उमेदवार निवडले, ते जिंकतील, असे प्रयत्न केले. त्याचा फायदा झाला. लोकसभेसारखे लढल्यास विधानसभेची निवडणूक हमखास जिंकू, असा विश्‍वास या नेत्यांना वाटू लागला आहे. त्यातच, नेहमी एकमेकांना खेचून, पक्षाचा विचार न करणाऱ्या राज्यातल नेत्यांवरचा भरवसा हायकमांडने वाढविला आहे. तरीही, या मंडळीबाबत गाफील न राहता, थेट दिल्लीच्या टीमने राज्यभराचा सर्व्हे करून त्यात आपण कुठे आहोत, पुन्हा सत्ता काबीज करता येईल, किती उमेदवार निवडून येतील, ते कुठच्या मतदारसंघातून याचा भलामोठा सर्व्हे काँग्रेसनं केला आहे. त्यातून आजघडीला आघाडीत राहूनही 75 जागा निवडून येतील, असे चित्र पुढे आले आहे. त्यानंतर आता प्रदेश काँग्रेसनेही पुन्हा एकदा सर्वेक्षण करून निवडणुकीच्या तयारी सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT