Uddhav thackeray, ambadas danve  Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve nomination: शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मित्रपक्षांना ठेवलं गाफील, ठाकरेंनी मोक्याच्या क्षणी बदलला निर्णय,दानवेंच्या उमेदवारीपूर्वी'मातोश्री'वर मोठ्या घडामोडी

Ambadas Danve nomination News : सहा महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या अंबादास दानवेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता दानवे यांना उमेदवारी जाहीर केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील येत्या काळात रिक्त होत असलेल्या विधानपरिषदेच्याच्या नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे. मंगळवारी भाजपने 6 उमेदवार जाहीर करीत अगदी घेतली असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवला. बुधवारी सकाळपर्यंत मिलिंद नार्वेकर 99% उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील असे म्हणत होते. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार समजेल असे स्पष्ट केले होते. मात्र, सकाळनंतर मातोश्रीवर पडद्यामागे वेगवान घडामोडी घडल्या. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या अंबादास दानवेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यातील महाविकास अगदी एकसंध राहावी यासाठी तीन ही घटक पक्षाकडून प्रयत्न केले जात होते. तीन पक्ष एकत्र बसून उमेदवारीबाबत निर्णय घेतील असे वाटत होते. मात्र, बुधवारी वेगवान घडामोडी घडल्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी त्यांच्याऐवजी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याबाबत सेनेच्या गोटातून कमालीचा सस्पेन्स पाळण्यात आला. उमेदवारी जाहीर केल्यानंतरच याबाबत सर्वांना समजले.

उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनीच विधानपरिषदेवर जावे, अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात, ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. मात्र, ऐनवेळी ठाकरेंच्या सेनेने उमेदवाराची घोषणा केली. या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले असतानाच दानवे यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भूमिका जाहीर करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाला समर्थन असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मविआतील घटक पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला मान्यता दिली होती. विधानपरिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असावेत, असे सांगितलं होते. अंबादास दानवेंचं नाव जाहीर केले असले तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असू, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती, त्या पक्षानं कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. पवारसाहेबांनी निर्णय घेतला असेल तर त्यात बदलण्याचा विषय येत नाही, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळ पोहचले थेट दिल्लीत

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस ट्विस्ट आणणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट दिल्लीत पोहचले असून त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसची भूमिका सांगितली होती. महाविकास आघाडी पक्षात तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो. निवडणुकीला कसे सामोरे जायचं यासंदर्भात ठरवलं जाईल, असं सचिन सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत जावं ही आमची भूमिका होती, आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, कोणाला उमेदवारी द्यायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. राज्यसभा असेल, पुढची विधानपरिषद असेल त्यासंदर्भात वाटपाचा निर्णय आहे. यासंदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सचिन सावंत म्हणाले.

SCROLL FOR NEXT