New Delhi News: भाजपच्या ऑपरेशन लोटसनं दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष फुटला आहे. राज्यसभेतील 10 पैकी राघव चड्ढा यांच्यासह आपचे खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हे सातही राज्यसभा खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांचं 'आप'मधील घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं चाललं आहे. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही. पक्ष टिकण्यासाठी कायदा तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही,असं अण्णा हजारे यांनी म्हटलं.
सत्ता आणि पैसा याच्या लालसेमध्ये येऊन नेते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात आहेत. मनमर्जीप्रमाणे पक्ष बदलत असून यापुढे जनतेनं लोकप्रतिनिधींना निवडून देताना चारित्र्यशील लोकांनाच निवडून द्यायला पाहिजे. हे जे राजकारणात सुरू आहे, ते स्वार्थासाठी सुरू असल्याचंही अण्णा हजारे म्हणाले.
भाजपनं महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्ष फोडल्यानंतर आता आम आदमी पक्षाला मोठा दणका दिला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील राघव चड्ढा,संदीप पाठक,राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंह साहनी,अशोक कुमार मित्तल,स्वाती मालीवाल,हरभजन सिंह या हे दहापैकी सात खासदार भाजपच्या गळाला लागले आहेत.तर उर्वरित तीन खासदार संजय सिंग,नरेनदास गुप्ता,संत बलबीर सिंग हे अद्यापही केजरीवालांसोबत असल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व 'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवालांना देशाची राजधानीतील सत्ता गमावल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा,संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षातून पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. तिघेही राज्यसभा खासदार आहेत. राघव चड्ढा यांनी दावा केला आहे की, आपमधील दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होत आहेत. या मोठ्या पक्षफुटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. "बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का",असं अरविंज केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाला राज्यसभेतील सात खासदार फुटल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. आता त्यापाठोपाठ आमदारही फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पंजाबमध्ये 50 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा केला आहे.
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, आपचे 50 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, पक्षानं याकडेही लक्ष द्यायला हवं. सध्या केवळ खासदार बाहेर पडले आहेत. आपची कोणतीही विचारधारा नाही. त्यामुळे खासदार फुटणे नैसर्गिक असून त्यांचा पंजाबशी काही संबंध नव्हता, अशीही टीका वारिंग यांनी केली आहे.
पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.2022 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवर आपने विजय मिळवला होता. केजरीवालांच्या 'आप'च्या लाटेत काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचा सुपडासाफ झाल्याचं दिसून आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.