

New Delhi News: आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ झाली आहे.आपचे खासदार राघव चड्ढा,अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी(ता.24) अचानकपणे पत्रकार परिषद घेत मोठा राजकीय बॉम्ब टाकला.यावेळी चड्ढा यांनी त्यांच्यासह तीन जण आपचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.तसेच त्यांनी आपचे तीनही राज्यसभा खासदार भाजपसोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलं.आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदार फुटल्यानंतर आता आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपनं महाराष्ट्रातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्ष फोडल्यानंतर आता आम आदमी पक्षाला मोठा दणका दिला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील राघव चड्ढा,संदीप पाठक,राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंह साहनी,अशोक कुमार मित्तल,स्वाती मालीवाल,हरभजन सिंह या हे दहापैकी सात खासदार भाजपच्या गळाला लागले आहेत.तर उर्वरित तीन खासदार संजय सिंग,नरेनदास गुप्ता,संत बलबीर सिंग हे अद्यापही केजरीवालांसोबत असल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व 'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवालांना देशाची राजधानीतील सत्ता गमावल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा,संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षातून पक्षाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. तिघेही राज्यसभा खासदार आहेत.राघव चड्ढा यांनी दावा केला आहे की, आपमधील दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होत आहेत. या मोठ्या पक्षफुटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. "बीजेपी ने फिर से पंजाबियों के साथ किया धक्का",असं अरविंज केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राघव चड्ढा यांच्या पत्रकार परिषदेनंतर काहीच मिनिटांत आम आदमी पक्षाचीही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून खासदार संजय सिंह यांनी फुटलेल्या खासदारांसह भाजपवरही जोरदार शाब्दिक हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, पंजाबमधील आमच्या आपचं सरकार पाडण्यासाठी भाजपचं हे प्रयत्न सुरु आहेत.त्यासाठी त्यांनी ऑपरेशन लोटस सुरु केलं असून त्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पंजाबच्या जनतेनं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम देऊन राज्यसभेवर निवडून गेलेल्या आणि भाजपात प्रवेश करत असलेल्या आपच्या खासदारांना पंजाबची जनता कायम लक्षात ठेवेन असा इशाराही आपचे खासदार संजय सिंग यांनी यावेळी दिला.
संजय सिंग म्हणाले, भाजपकडून पंजाबच्या भगवंत मान सरकारच्या चांगल्या कामांना रोखण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत.पंजाबच्या खासदारांची राज्यसभेत आपच्या खासदारांमध्ये सर्वाधिक संख्या आहे.भाजप,पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ऑपरेशन लोटस,घाणेरड्या राजकारणाचा खेळ सुरू असल्याचं संजय सिंग यांनी सांगितलं.
आपचे खासदार संजय सिंग यांनी काही दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्या इथं ईडीनं छापेमारी केली होती. त्यामुळं या पक्षांतराच्या गोष्टी अशाप्रकारे जुळतात, ईडीचा छापा पडला आणि फोडलं असा आरोप केला आहे. याचाच अर्थ राजकीय नेत्यांना भीती दाखवून प्रशासनिक यंत्रणांचा गैरवापर करुन हे ऑपरेशन लोटस चालवलं जात आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की, पंजाबची जनता या गद्दारांना कधीही माफ करणार नसल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे. चड्ढा यांना काय-काय दिलं नाही", असंही संजय सिंग यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.