Ram Temple donation investigation update: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानप्रकरणावरून राजकीय वातावरण तापत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी मंदिरात मनुष्यबळ पुरवणाऱ्या भारत विकास ग्रुप (BVG) या कंपनीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.
अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दावा केला की, करारानुसार BVG कंपनीने श्रीराम मंदिरात कर्मचारी पुरवले होते. उपलब्ध माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांपैकी काही जण दान मोजण्याच्या प्रक्रियेतही सहभागी होते.
त्यामुळे संबंधित कंपनीलाही चौकशीसाठी का बोलावले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, जर चौकशी होत नसेल तर या कंपनीला कोण संरक्षण देत आहे, अशीही विचारणा त्यांनी केली.
अयोध्येतील श्रीराम (Ram Mandir) जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशी संबंधित कथित दानप्रकरणाची चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (SIT) चौकशी करत आहे.
या प्रकरणात ट्रस्टशी संबंधित काही व्यक्तींची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टमधील दोन सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, या आरोपांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत.
या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईत पावसात 'श्रीराम रक्षा आरती' आंदोलन केले होते. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावर टीका केली होती. यानंतर अंबादास दानवे यांनी BVG कंपनीचा उल्लेख करत चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणातील राजकीय चर्चा आणखी तीव्र झाली आहे.
अंबादास दानवे यांनी BVG कंपनीला राज्यातील विविध सरकारी विभागांमधून मिळालेल्या कामांचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडे 2012 पासून आरोग्य विभागातील 108 रुग्णवाहिका सेवा आणि त्यानंतरचा विस्तारित करार झालेला आहे.
याशिवाय नागपूर आणि पिंपरी-चिंचवडमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बृहन्मुंबई महापालिकेतील शाळा आणि रुग्णालयांची स्वच्छता सेवा, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य वेअरहाऊसिंग महामंडळ आणि महसूल विभागासाठी मनुष्यबळ पुरवठा, 'आनंदाचा शिधा' योजनेशी संबंधित कामे दिलेली आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, दानवे यांच्या आरोपानंतर, संबंधित कंपनी किंवा तपास यंत्रणांनी कोणती प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे. तसेच BVG कंपनीविरोधात कोणताही दोष अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे कंपनी दानवेंच्या आरोपांवर काय प्रत्युत्तर देते, याकडे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.