महाराष्ट्र

Harshavardhan Patil : फडणवीसांच्या संमतीनेच हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार; कार्यकर्त्यांना सगळं सांगितलं...

Rajanand More

Pune News : भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर तुतारी हाती घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या निर्णयाला फडणवीस यांचीही संमती असल्याचे मानले जात आहे.

पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, इंदापूर तालुका स्वाभिमानी आणि अन्याय सहन न करणारा आहे. आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काल शरद पवारांनी मला बोलवले होते. काल सिल्व्हर ओकला आमची बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातील बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभा निवडणूक लढवा, असे शरद पवार मला म्हणाले. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या, बाकीची जबाबदारी माझी राहील, असे शरद पवार म्हणाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

आपण राष्ट्रवादीत प्रवेश करायचा की नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारले. त्यावर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, असे नारेबाजी कार्यकर्त्यांनी केली. त्यांनंतर पाटील यांनीही काहीवेळात याची घोषणा करू असे स्पष्ट केले. चार दिवसांपूर्वी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांनी काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवली. मीही माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यावर दोघांची सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितले, मला आता माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाविरोधात जाता येणार नाही, असे फडणवीसांना सांगितल्याचे पाटील म्हणाले.

मागील दहा वर्ष कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप अन्याय सहन केला आहे. तालुक्यातील जनतेच्या ज्या भावना आहेत, त्यामागे मला उभे राहावे लागेल, असे मी फडणवीस यांना सांगितले. त्यांना भेटून आल्यानंतर मग पवारसाहेबांची भेट घेतली, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

ज्या पक्षात आपण जाणार आहोत, त्या पक्षाचे नेते यापुढील भूमिका जाहीर करतील. आपण निर्णय घ्यायचा आणि त्यांना कळवायचा, त्यासाठी तुम्हाला इथे बोलावले आहे. या तालुक्यात झालेले राजकीय निर्णय जनतेच्या आग्रहाखातर झाले आहेत. हा तालुक्याचा इतिहास आहे. पवार साहेब आणि आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे आपण कधी टोकाचे निर्णय घेतले नाहीत, असे पाटील म्हणाले.

आपण निर्णय घेतल्यानंतर कुणावर टीका करू नका, यावर काही बोलू नका, सोशल मीडियात काही लिहू नका. मागील दहा वर्षात झालेला त्रास दूर करायचा असेल तर त्यासाठी कमी करू, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT