ram kadam, anil deshmukh
ram kadam, anil deshmukh sarkarnama
महाराष्ट्र

अनिल देशमुखांचे बॅास कोण ? बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मध्यरात्री अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही अटक करण्यात आली. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी या महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे.

भाजपचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनी आज सकाळी टि्वट करुन देशमुखांच्या (anil deshmukh) अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या टि्वटमध्ये कदम म्हणतात की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?”

ईडी आणि CBI अनिल देशमुख यांच्या मास्टरमाइंडचा पण शोध घेतील, असे भाजपचे नेते अतुल भातखळ यांनी सांगितलं. आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना तब्बल पाच समन्स बजावले होते. परंतु ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. मात्र, काल सकाळी अकरा वाजता ते अचानक ते ईडी कार्यालयात दाखल झाले होते. यानंतर ईडीकडून त्यांची तब्बल 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मध्यरात्री अटक केली.

ईडीकडून बजावण्यात आलेल्या समन्सच्या विरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले आणि त्यांना त्यांच्या वकिलासह ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन काही माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार मी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होत आहे आणि मी माझ्या वकिलांसोबत ईडीसमोर हजर राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीच्या अधिकार्‍यांनी या वर्षी जूनमध्ये अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अटक केली होती.

तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्यामार्फत देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसूलीचे जे आरोप करण्यात आले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा गंभीर आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT