Raj Thackeray
Raj Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

महाविकास आघाडीपुढे पेच : राज ठाकरेंना अटक म्हणजे `इकडे आड आणि तिकडे विहिर`

सरकारनामा ब्युरो

मुंबई : औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न करण्यात आल्याने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Raj Thackeray latest news)

मात्र राज ठाकरे यांना अटक करणार का? तो धोका महाविकास आघाडी घेणार का? आणि घेतल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? महाविकास आघाडीला त्याचा काही फायदा-तोटा होईल का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

राज ठाकरे यांना अटक होईल का? याबाबत बोलताना साम वाहिनीच्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक म्हणाल्या, राज ठाकरे यांना अटक करायची का नाही, याबाबत सध्या दोन मतप्रवाह आहेत. कारण राज ठाकरे यांना अटक केल्यास त्याचा फायदा मनसेला होवू शकतो असा एक मतप्रवाह आहे. पण राज ठाकरेंच्या भाषणामुळे दोन समाजात तणाव वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे अटक करण्याची कारवाई करावी, असेही मत आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आल्यास राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

तर 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस म्हणाले, प्रथमदर्शनी राज ठाकरे यांना अटक करतील असे वाटतं नाही. पण अटक केली तरी त्याचा महाविकास आघाडीला धोका दिसत नाही आणि राज ठाकरे मोठे होण्यात महाविकास आघाडीला फायदा आहे. कारण आतापर्यंत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर जेरीस आणले आहे, एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरा मु्द्दा शरद पवार यांच्यावरील थेट टीका. आता मागील काही दिवसांपासून हे दोन्ही मुद्दे संख्यात्मक ताकद नसलेल्या मनसेने ताब्यात घेतले आहेत. म्हणजे ज्यांच्या हातातच काही नाही त्यांच्या हातात हे मुद्दे गेले आहेत.

त्यामुळे आता संख्यात्मक ताकद असलेल्या भाजपकडून या मुद्द्यांची धार बोथट होईल. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जेवढी गर्दी मनसेला जमवता आली तेवढी भाजपला जमवता आली नाही. शिवाय शरद पवारांवर देखील आता राज ठाकरे थेट टीका करत आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडी बाजूला राहुन कालांतराने भाजप-मनसेमध्येच नेमके कोणते मुद्दे घ्यायचे यावरुन वाद निर्माण होतील. त्यामुळे भाजपलाही या मुद्द्याचा फारसा फायदा होईल असं वाटतं नाही, असेही मत फडणीस यांनी व्यक्त केले.

यावरच बोलताना `सकाळ`च्या विशेष प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, राज ठाकरे यांना अटक करतील, असे वाटतं नाही. कारण अटक झाली तर तेच मोठे होतील आणि आतापर्यंत केवळ सभेची गर्दी मतांत रुपांतरीत होईल. यासाठी २००८ चे उदाहरण घेवू शकतो. त्यावर्षी राज ठाकरेंना उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शन केली होती. त्यानंतर २००९ साली मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यानंतर आता पुन्हा अटक झाल्यास राज ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा ताकद मिळू शकते, असेही नानिवडेकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT