devendra fadnavis chhagan bhujbal sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : भुजबळांची कबुली; महायुतीत भाजपच मोठा भाऊ...

Sachin Waghmare

Ncp News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षाची ताकद समजली असून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीत घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याचे आतापासूनच समीकरण ठरवले जात आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे मान्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईमध्ये पार पडला. या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल उपस्थित आहेत. यावेळी सर्वच नेतेमंडळींनी शरद पवार गटावर टीका केली. (Chagan Bhujbal News)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) गटाच्या वाट्याला कमी जागा आल्याने पक्षात नाराजी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार यावरून कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीमधील नेत्यांकडून महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा मिळतील तेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नऊ जागी विजय मिळवला आहे, त्याशिवाय भाजपकडे विधानसभेच्या जवळपास 104 जागा आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असणार आहे, त्यामुळे भाजप (Bjp) हा मोठा पक्ष असल्याचे आम्ही मान्य केले असल्याचे यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी कबूल केले आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार याबाबत लवकर चर्चा केली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जागावाटप करीत असताना उशीर झाला. त्यामुळे काही ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी लवकर जागावाटप करून तयारीला लागले पाहिजे, असेही यावेळी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाचा फटका राज्यातील दोन-तीन जागांवर बसला आहे. त्यापेक्षा अधिक जागांवर मराठा आरक्षणाचा अंडर करंट जाणवला नसल्याचे सांगत येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव जाणवणार नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT