Chhattisgarh 2023 News Sarkarnama
महाराष्ट्र

Chhattisgarh Election News : छत्तीसगडची `लक्ष्मी` कोणाला पावणार ?

Jagdish Pansare

chhattisgarh assembly News : छत्तीसगड राज्याची सत्ता दुसऱ्यांदा काँग्रेसच्या हाती येण्याची शक्यता सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. काँग्रेससाठी ही सुखावणारी बाब असली तरी भाजपच्या घोषणा आणि मोदी गॅरंटी छत्तीसगडच्या (Chhattisgarh Election News) मतदारांना भुरळ घालण्यात किती यशस्वी ठरते हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे. छत्तीगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला होता.

त्यापैकीच एक घोषणा निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी केली होती. ती म्हणजे `छत्तीसगड गृहलक्ष्मी योजना` या अंतर्गत राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर राज्यातील महिलांना दरवर्षी पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

याला प्रत्युतर म्हणून भाजपनेही `महतारी लक्ष्मी योजना` जाहीर केली आणि त्या अंतर्गत राज्यातील विवाहित महिलांना दरवर्षी 12 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. (Congress) या दोन्ही योजनांची राज्यभरात बरीच चर्चा झाली. उद्या, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. (BJP) यानंतरच छत्तीसगडची (Chhattisgarh) `लक्ष्मी` कोणाला पावणार? हे स्पष्ट होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने छत्तीसगडची सत्ता हस्तगत करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा हेच भाजपच्या प्रचाराचे प्रमुख अस्त्र होते, तर निवडणुका लढवण्यासाठी `चाणाक्य` म्हणून ओळखले जाणारे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडच्या जनतेसाठी विविध योजनांचा समावेश असलेला जाहीरनामा प्रसिद्ध करत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये चार वर्षांत केलेली विकासकामे आणि आदिवासींसाठी राबवण्यात आलेल्या विविध योजना सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जोरदार हल्ला चढवल्याचे दिसून आले. यात मोदी सरकारने उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नको? हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थितीत केला होता. याचा परिणाम किती झाला? हेही उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मोदी गॅरंटी...

छत्तीसगडची सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भाजपने आपल्या जाहीरनाम्यात घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. त्यानुसार शेतकऱ्यांकडून ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने भात खरेदी, महिलांना वर्षांला १२ हजार रुपये, गरीब कुटुंबांतील महिलांना ५०० रुपयांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. पंतप्रधान निवास योजनेंतर्गत १८ लाख घरे, अतिरिक्त तेंदू पानांसाठी ४,५०० रुपयांचा बोनस याचाही छत्तीसगडसाठी देण्यात आलेल्या मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश होता.

काँग्रेसकडून शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन...

भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही मतदारांसाठी नवनव्या घोषणांचा पिटारा उघडला होता. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांना प्रत्येक वर्षी १५,००० रुपये, गॅस सिलिंडरसाठी अनुदान, भूमिहीन मजुरांना १० हजार रुपये, धान व तेंदू पत्ता खरेदी करताना अधिक पैसे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासारख्या घोषणांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याइतपत राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.

परंतु यावर काँग्रेसने केंद्राकडे बोट दाखवत उद्योगपतींच्या कोट्यवधींच्या कर्जमाफीचा हवाला देत शेतकऱ्यांसाठी हे का करता येणार नाही? असा पलटवार केला होता. २०१८ च्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किंचित घटली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमताचा आकडा पार करेल असे दिसते, तर भाजपच्या आमदारांची संख्या गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी दुप्पट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे; पण याने भाजपचे समाधान होणार नाही एवढे मात्र निश्चित.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT