Avinash Pandey 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi And Avinash Pandey : राहुल गांधीमध्ये दैवी शक्तीचं अस्तित्व; संघभूमीत 'या' नेत्याचं विधान

Pradeep Pendhare

Nagpur News : राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रेचा फायदा लोकसभा निवडणुकीला झाला. या दोन्ही यात्रा आजही चर्चेत आहेत. या यात्रेचा फायदा लोकसभा निवडणुकीला काँग्रेसला झाला. महाराष्ट्रात काँग्रेसला 'अच्छे दिन' आले.

राहुल गांधी यांच्या देहबोलीमध्ये वाढलेला आत्मविश्वास भाजप सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू लागला आहे. यातून काँग्रेसमधील जुन्या आणि जाणत्यांनी देखील राजकीय संघर्षासाठी कंबर कसली आहे. यातच राहुल गांधीमध्ये दैवी शक्ती आहे, असं संघभूमी, नागपुरात काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी विधान केलं आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) डॉ. झाकीर हुसेन विचार मंचाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे सहभागी झाले होते. तिथे त्यांनी राहुल गांधी यांचा वाढलेल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले. पांडे यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी यांची तुलना थेट देवाशी केली. अविनाश पांडे यांच्या या विधानानं राजकीय विरोधकांच्या भुवया उंचवल्या नसतील, तर नवल आहे.

अविनाश पांडे म्हणाले, "जोपर्यंत एखाद्या व्यक्तीत दैवीशक्ती असत नाही, किंवा त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव असत नाही, तोपर्यंत कोणताही व्यक्ती 10 हजार किलोमीटरची पायी यात्रा काढू शकत नाही." अविनाश पांडे यांनी असे म्हणत, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना थेट देवाशी केली.

'देशाची स्थिती पाहून राहुल गांधी सरळ जनतेत गेले. त्यांचा हा निर्णय क्रांतिकारी ठरला. हा निर्णय सोपा नव्हता. कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई, अशा पदयात्रा करताना राहुल गांधी यांनी त्यांचे वैयक्तिक आरोग्य आणि सुरक्षेची काळजी केली नाही. दहा हजार किलोमीटर देशाच्या रस्त्यांवर पायपीट केली. या पदयात्रेमुळे राष्ट्राच्या वातावरणात उत्साह निर्माण झाल्याचा दावा', अविनाश पांडे यांनी केला.

राहुल गांधी भाजपविषयी काय म्हणाले...

राहुल गांधी यांचा कोल्हापूरचा दौरा ऐतिहासिक ठरला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्यात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचं कौतुक होत आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब संविधान असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक विचार हा संविधानात आलेला आहे. त्यांच्याच विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते, तर आपलं संविधानही नसते. छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे याच विचारधारेच्या विरोधातील लढाई जुनी असून, तिच काँग्रेस पक्ष लढत आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी भाजपवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT