- विनोद राऊत
Congress In Maharashtra : केंद्रीय वा राज्य पातळीवरील नेत्यांचे नसलेले पाठबळ, कोणतीही आघाडी नाही, संसाधनाचा अभाव असतानाही, काँग्रेसने नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका लढवल्या. अशा बिकट अवस्थेत काँग्रेसने 41 नगर परिषदा जिंकत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. नेहमीप्रमाणे या वेळीही काँग्रेसची लाज वाचवण्यासाठी विदर्भ धावून आला.
नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने विभागनिहाय जबाबदाऱ्याचे वाटप केले होते. विजय वड्डेटीवार यांच्याकडे नागपूर विभाग, सतेज पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, बाळासाहेब थोरातांकडे उत्तर महाराष्ट्र, यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभाग, अमित देशमुख यांच्याकडे मराठवाडा, तर नसीम खान यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपवली होती.
यापैकी वड्डेटीवार वगळता इतर सर्व नेते अपयशी ठरले. वड्डेटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 8 नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकावला. त्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चांगली साथ दिली. माजी मंत्री अमित देशमुख यांना स्वतःच्या लातूर जिल्ह्यातही एकही नगर परिषद जिंकता आली नाही. लातूर वगळता ते इतर जिल्ह्यांत फिरकले नाहीत.
बाळासाहेब थोरात यांना अहिल्यानगरमध्ये केवळ एकाच नगर परिषदेवर सत्ता मिळवता आली. सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून 3 नगराध्यक्ष निवडून आणले. यातही पलूसमध्ये आमदार विश्वजीत कदम यांचा करिश्मा असल्याचे दिसून येते. त्यामुळे महायुतीच्या वादळात केवळ तिघांनी काँग्रेसला वाचवलं असं म्हंटलं तर वागवं ठरणार नाही.
आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत विदर्भाने काँग्रेसला तारले आहे. राज्यात निवडून आलेल्या काँग्रेसच्या 41 नगराध्यक्षांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 23 जण एकट्या विदर्भातील आहेत. राज्यातील काँग्रेसच्या एकूण 1006 नगरसेवकांपैकी विदर्भातील 576 जण आहेत. अनेक ठिकाणी खासदार, आमदारांनी निवडणुकीत फारसे लक्ष घातले नाही. उमेदवारांना प्रचाराचे साहित्यही पाठवले नाही. निधीअभावी प्रचार यंत्रणा नीट राबवता आल्या नाहीत.
राज्यात मुंबई वगळता काँग्रेसचे 12 खासदार आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा अपवाद वगळता उर्वरीत 11 खासदारांची या निवडणुकीतील कामगिरी शून्य ठरली. गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि लातूरमधील काँग्रेसच्या खासदारांना त्यांच्या जिल्हांत एकही नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही.
काँग्रेस खासदार असलेल्या धुळ्यात 1, भंडारा-गोंदियात 3, नांदेड, जालना, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 2असे एकूण 10 नगराध्यक्ष निवडून आले; परंतु या विजयात संबंधित खासदारांचे फारसे योगदान नसल्याचे म्हटले जाते. राज्यातील काँग्रेसच्या 12 खासदार आणि 16 आमदांनी प्रत्येकी एक-एक नगर परिषद जिंकून दिली असती, तरी ती संख्या 28 वर गेली असती.
यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, म्हणाले निवडणुकीत सर्व नेत्यांना सोबत घेतले, उमेदवार ठरवण्याचे अधिकारही स्थानिक पातळीवर दिले. जबाबदार्याही वाटून दिल्या, मात्र त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
तर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले, भाजपमध्ये (BJP) निवडणुकीदरम्यान जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. कामाचा अहवाल वरिष्ठांपर्यंत पाठवून त्याचे मूल्यांकन होते. काँग्रेसमध्ये जबाबदारीचे तत्त्वच अस्तित्वात नसल्याने अपयशासाठी कुणालाही जबाबदार धरले जात नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.