Ramesh Chennithala BJP fixing remark : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुकीत 'फिक्सिंग' झाल्याचा आक्षेपांवर निवडणूक आयोगासह भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील शिवसेनेने देखील राहुल गांधी यांच्या या आक्षेपांवर प्रतिहल्ले चढवले.
राहुल गांधी यांचे हे आक्षेप भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले. राहुल गांधी यांच्या लेखाला देवेंद्र फडणवीस यांनी लेखांनीच उत्तर दिलं. यावर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पुन्हा भाजपला डिवचलं आहे. भाजपचा खुलासा म्हणजे 'फिक्सिंग'वर शिक्कामोर्तब, असा जोरदार टोला रमेश चेन्नीथला यांनी लगावला आहे.
रमेश चेन्नीथला म्हणाले, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे उल्लंघन केल्याची तर्कसंगत मांडणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लेखातून केली आहे. यातून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित होते; मात्र भाजप त्याची उत्तरे देत आहे. हे निवडणुकीत 'फिक्सिंग' झाल्याचे शिक्कामोर्तब करणारे आहे".
विधानसभा निवडणुकीत जे झाले तो लोकशाही प्रक्रियेवर सुनियोजित हल्ला होता. एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) लोकशाही मूल्यांना काळिमा फासला जात आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस सातत्याने पाठपुरावा करीत आहे; पण त्यावर समाधानकारक खुलासा केला जात नाही. केवळ वरवरची उत्तरे दिली जातात, असा आरोप रमेश चेन्नीथला यांनी केला.
चंदीगड उच्च न्यायालयानेही हरियाना विधानसभा निवडणूकप्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरण देण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर सरकारच्या मदतीने नियम बदलून ती माहिती देता येणार नाही, असे सांगण्यात आले, ते का आणि कशासाठी? असा सवालही चेन्नीथला यांनी केला आहे.
केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कसा घोटाळा झाला आहे, हे काँग्रेसने निकालानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह मांडले होते. पण आयोगाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. या सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे आयोगाने देणे अपेक्षित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधी यांच्या लेखाला उत्तर देणारे लेख लिहित आहेत. फडणवीस यांनी आयोगाची वकिली करू नये, असा घणाघात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का देत आहेत? मतदानाच्या शेवटच्या काही तासांत मतदान इतके कसे वाढले, यांचे उत्तरे अद्याप निवडणूक आयोग देऊ शकलेले नाहीत. त्याची उत्तरे फडणवीस देत आहेत. ते काय निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.