Raj Thackeray Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Fadnavis on Raj Thackeray : युतीबाबत फडणवीसांकडून एक घाव दोन तुकडे; राज ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चेवर मोठे विधान, म्हणाले...

Devendra Fadnavis statement on alliance News : मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली म्हणून राजकीय समीकरणे बदलणार नसल्याचे स्पष्ट करीत मतचोरीच्या आरोपानंतर त्यांच्यावर टीका करीत युतीच्या शक्यतेचे एक घाव दोन तुकडे करून टाकले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीसोबत येतील, असे काही भाजप नेत्यांना वाटत होते. त्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर संभाळून टीका केली जात होती. विशेषतः नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी एकट्या उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी राज ठाकरेंवर टीका करणे टाळले होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर जाऊन सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे यांनी भाजपवर मतचोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली म्हणून राजकीय समीकरणे बदलणार नसल्याचे स्पष्ट करीत मतचोरीच्या आरोपानंतर त्यांच्यावर टीका करीत युतीच्या शक्यतेचे एक घाव दोन तुकडे करून टाकले आहेत.

आगामी काळात होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढविणार आहे. लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरुन युती ठरत नाही किंवा त्यावरुन राजकारणही होत नसते. एखादा नेता मला भेटला यावरुन राजकारण होत नसते, असे वक्तव्य करत फडणवीस यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत राहतील, याबाबतचा विषय संपवला आहे.

येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढेल आणि महायुतीच जिंकेल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला होता. याविषयी देवेंद्र फडणवीसांना विचारताच त्यांनी या दाव्याची खिल्ली उडवली.

'अभ्यास न करता छाती बडवण्याचे काम'

फडणवीस म्हणाले, 'मला एक गालिबचा शेर आठवतो. गालिबने म्हटले होते की, 'दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है...' मी यावर एवढेच बोलेन. जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील. 2014 मध्ये मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती.15-15 वर्षांपासून सत्ता होती.

जोवर विरोधक विचार करणार नाही की आपण का हरतो आहे, जनतेने आपल्याला का नाकारले आहे, याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचा काम करतील, तोवर हे जिंकणार नाहीत. विरोधक लोकांचा अपमान करतील तोपर्यंत निवडून येणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT