Dhangar Reservation: Sarkarnama
महाराष्ट्र

Dhangar Reservation: धनगर आरक्षण पुन्हा पेटणार; यशवंत सेना आक्रमक, उद्यापासून...

राजेंद्र त्रिमुखे

Nagar : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये 6 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर असे 17 दिवस बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

या उपोषणाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे आदींनी मध्यस्थी करत 50 दिवसांत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमधील समावेश याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आज पन्नास दिवस पूर्ण होत असतानाही राज्य सरकारने हे आश्वासन न पाळल्याने यशवंत सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने धनगर समाजाची क्रूर थट्टा केली आहे, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केला आहे.

गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी भांडत आहे. मात्र, आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मात्र, आता समाज जागृत झाला असून, जोपर्यंत अनुसूचित जमातीमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन केलं जाईल, असे दोडतले यांनी स्पष्ट केले आहे.

उद्यापासून (16 नोव्हेंबर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत चौंडीमध्ये पुन्हा एकदा यशवंत सेनेचे कार्यकर्ते आमरण उपोष उपोषण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना यशवंत सेनेचे अध्यक्ष दोडतले, माणिकराव दांगडे, नितीन धायतोडे आधी उपस्थित होते. धनगर समाजाला राज्य सरकारने आश्वासन देऊन क्रूर थट्टा केली आहे. मात्र, यापुढे आता सरकारच्या भूलथापांना समाज बळी पडणार नसून मुख्यमंत्री जोपर्यंत धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीबद्दल निर्णय घेत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन चौंडीमध्ये सुरूच राहिल, असं दोडतले यांनी स्पष्ट केलं.

धनगर समाजाच्या आंदोलनाला माजी मंत्री राम शिंदे यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून, धनगर समाज आणि सरकारमध्ये त्यांनी दुव्याचे काम केलं आहे, असे मत दोडतले यांनी या वेळी व्यक्त केले. मात्र, सरकारने आता याबद्दल अंतिम तोडगा काढावा, अशीही अपेक्षा दोडतले यांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाजाच्या वतीने आतापर्यंत शांततेत आंदोलन केले आहे. मात्र, सरकारने नेहमीप्रमाणेच जर आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि मागणी मान्य केल्या नाही तर समाजाच्या वतीने मराठा समाजाला ज्या पद्धतीने आक्रमकपणे आंदोलन करावे लागलं त्या मार्गाला समाज जाईल, असा गर्भित इशारा दोडकले यांनी या वेळी दिला आहे.

यशवंत सेनेच्या वतीने चौंडीमध्ये आमरण उपोषण आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाच राज्यभरात अनेक शहरांमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते साखळी उपोषण आंदोलन करतील त्याचबरोबर काही शहरांमधील कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. धनगर समाज आता आपल्या मागणीवर आक्रमक झाला असून सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर मंत्र्यांना धनगर समाज घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही या वेळी दोडतले यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT