Ajit Pawar, Sushma Andhare, Devendra Fadanvis  Sarakarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : अजितदादांना महायुतीत घेताना फडणवीसांना देश मोठा वाटला नाही का? अंधारेंचे एक घाव दोन तुकडे

Sachin Waghmare

Political News : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. यामुळे महायुतीमधील भाजपची चांगलीच अडचण झाली. या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत जोरदार टोला लगावला.

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असल्याने फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहीत मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते आरोप पाहता त्यांना 'महायुती'मध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे ट्विटरवरून पत्र पाठवत म्हटले आहे. त्यावर अंधारे यांनी सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती ते पत्रात लिहिताहेत, पण मुळात अजितदादांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप करून 48 तासांच्या आतच त्यांना सत्तेत सामावून घेणाऱ्या फडणवीसांना देश मोठा वाटला नाही का ? असा खोचक सवाल केला आहे.

नवाब मलिक गुरुवारी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हिवाळी अधिवेशनानिमित्त विधान भवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात काही वेळ ते बसले होते. त्यानंतर, सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर ते शेवटच्या रांगेत जाऊन बसले. यावरून त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले.

सभागृहात नवाब मलिक हे अजित पवार गटात गेल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सवाल केला की, सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर त्यांनीच गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, पण दानवेंच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष तुरुंगात असतानादेखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही असे म्हटलं होतं, ते आता येथे भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही, असे म्हणत त्यांनी उलट महाविकास आघाडीच्या काळात नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही म्हणून धारेवर धरले होते, तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही फडणवीसांना ट्विटरवरून जोरदार टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात भाजपवर सर्वच स्थरातून मोठ्या प्रमाणात टीका केली जात असल्याने त्यांची मोठी अडचण झाली. त्यामुळे या प्रकरणी फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवत त्यामध्ये म्हटले आहे, की "माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत. ते पाहता त्यांना 'महायुती'मध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे,' असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

भाजपला फडणवीस कधी पत्र लिहिणार

दुसरीकडे हे पत्र पाठविल्यानंतर पुन्हा सुषमा अंधारे यांनीही फडणवीसांना कोंडीत पकडत टीका केली आहे. सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती ते पत्रात लिहिताहेत, पण मुळात अजितदादांवर 70,000 कोंटीच्या घोटाळ्यांचे आरोप करून 48 तासांच्या आतच त्यांना सत्तेत सामावून घेणाऱ्या भाजपला फडणवीस कधी पत्र लिहिणार याची आम्ही वाट पाहत आहोत, असे म्हणत ट्विट केले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT