Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीतील वाद थांबेना! अजितदादांच्या आमदाराला मतदान करणार नाही; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

Sachin Waghmare

Latur News : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये सुरु असलेला आरोप-प्रत्यारोपाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. शिंदे गटाचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेत आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये सध्या चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजप प्रवक्ते असलेले गणेश हाके यांनी अजित पवार गटावर तोंडसुख घेतले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी सावंत व हाके यांच्यावर टीका केली. त्यानंतर रविवारी लातूर ग्रामीणचे भाजप (Bjp) जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला मतदान करणार नसल्याचे सांगत वात पेटवून दिली आहे. (Mahayuti News )

लातूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पुन्हा एकदा मित्रपक्षावर निशाणा साधला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरात टीका केली. भाजप म्हटले की राष्ट्रवादीवाल्यांचे डोकं उठतं, असे म्हणत राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपच्या कोणत्याच कार्यकर्त्याला कधीही जवळ केले नाही, असे म्हणत देशमुख अजित पवार गटावर तुटून पडले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे महायुतीमधील नाराजी पुन्हा उघड झाली आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला समावेश, अजित पवारांना देण्यात आलेलं अर्थ मंत्रीपद, त्यांच्याकडून करण्यात येणारं निधी वाटप या सगळ्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी खदखद बोलून दाखवली. 'बाबासाहेब पाटील अहमदपूर तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला कधीच जवळ केले नाही हा इतिहास आहे. आता ते आमच्या महायुतीत सामील झाले आहेत

सध्या अजित पवारांकडे अर्थ खाते आहे. आता त्यांच्याकडे कितीही मागा. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे जिथे जिथे आमदार आहेत, तिथेच पैसे दिले. बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूरला 200-250 कोटी नाही. तर तब्बल 2500 कोटी रुपये दिले, अशी आकडेवारी देशमुखांनी मांडली.

'बाबासाहेब पाटील यांनी कधीच भाजप कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. निधी आमचा आहे. सरकार आमचं आहे. तिन्ही पक्षांना समान वाटा करुन निधी देणं त्यांचं काम आहे. पण त्यांनी तसं केलं नाही. लोकसभेला आमच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं एकही मत भाजप उमेदवाराला पडले नाही. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही? असेही देशमुखांनी स्पष्ट केले.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाही. भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचे मत आमदार बाबासाहेब पाटील यांना मिळणार नाही, हे तुम्हाला माहीत असावे. माणसाने इतके स्पष्ट बोलावे, असे परखड मत देशमुखांनी कार्यकर्त्यासमोर व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT