Then News : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने आता सहकार क्षेत्राच्या चौकटीपलीकडे जाऊन थेट महायुतीतील राजकीय शक्तिप्रदर्शनाचे रूप धारण केले आहे. सर्व पक्षीय सहकार पॅनलला पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटून पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आहे. त्यामुळे ही निवडणूक आता ‘महायुती विरुद्ध महायुती’ अशीच बनली आहे. दरम्यान या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकाराची भूमिका बजावणार की परिवर्तन घडवणार याकडे लक्ष लागले आहे.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 जूनला पार पडणार आहे. अवघ्या तीन-चार दिवसांवर मतदान आले असताना वेगवान हालचालींनाही जोर धरला आहे. सहकार विरुद्ध परिवर्तन या दोन पॅनलमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारात आतापर्यंत स्थानिक नेते आघाडीवर होते. मात्र मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सहकार पॅनलच्या समर्थनार्थ भूमिका जाहीर केल्याने या लढतीत नवे राजकीय वळण आले आहे.
विरोधकांकडून शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. २१ संचालक पदांपैकी १० जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी आठ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले असल्याचा दावा केला जात आहे . त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी केवळ तीन जागांची आवश्यकता असतानाही उर्वरित सर्व ११ जागा जिंकण्याचा दावा सहकार पॅनलकडून केला जात आहे. या आत्मविश्वासामुळेच विरोधकांकडून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
दरम्यान, राजकीय वर्तुळात मात्र चर्चा वेगळीच रंगली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे सहकार पॅनलसाठी उघडपणे मैदानात उतरल्यावर परिवर्तन पॅनलच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सक्रिय होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ही परंपरेने सहकार क्षेत्रापुरती मर्यादित मानली जात असली तरी यंदा ती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चाचणी ठरत आहे. ठाणे, पालघर आणि ग्रामीण भागातील प्रभावी सहकारी संस्थांचे मतदान, विविध राजकीय गटांचे संख्याबळ आणि भविष्यातील स्थानिक राजकारणाची दिशा या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. विशेष म्हणजे एकीकडे जिल्हा बँकेच्या निमित्ताने संपूर्ण शिवसेना शिंदे गट एकत्र असल्याचे दिसत असताना भाजपमध्ये मात्र उभी फुट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.