Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनिकरणाच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून विलिनीकरणाच्या चर्चांवर मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. याचदरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून नवी अपडेट समोर येत आहे.
आता केंद्रीय निवडणूक आयोगानं थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे. हे पत्र निवडणूक आयोगाने 27 जुलैला सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून एक गंभीर बाब आयोगाकडून अधोरेखित करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या अधिवेशनातल्या कलम 6, 7, 12, 32 आणि 36 याबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीकडून करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बदलाबाबतचे कागदपत्रे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले नसल्याचं म्हटलं आहे. याबाबतच आयोगानं आता पवारांकडे विचारणा केली आहे.
निवडणूक आयोगाने पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगानं या पत्रात राष्ट्रवादीच्या पक्षघटनेत केलेल्या बदलांसंबंधीचे कागदपत्रे आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात यावे असंही नमूद केलं आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? असा सवालही निवडणूक आयोगानं पत्रात सुनेत्रा पवारांना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं 26 फेब्रुवारीला अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. याच अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिलं होतं. त्यांनी पवार यांच्या निवडीवर आक्षेप नोंदवत नोटीस पाठवली होती. त्यांनी नोटिशीतून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली होती. सिंह यांच्या या नोटिशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या पत्राबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक आयोगासोबत सातत्यानं विविध कारणांनी पत्रव्यवहार सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच यावेळी पाठवलेलं पत्रही त्याचाच एक भाग असून तो नियमित प्रशासकीय विषय असल्याचं नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.