Waqf Board Padmanabhaswamy Temple sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics :'वक्फच्या आडून भाजपला पद्मनाथ मंदिरातील सोनं लंपास करायचय', हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक दावा

Harshvardhan Sapkal BJP Waqf Board Padmanabhaswamy Temple : राज्यात 288 पैकी 239 आमदार महायुतीचे आहेत. येवढे पाशवी बहुमत आहे तर त्यांनी काम करावं. दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत,असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Roshan More

Harshvardhan Sapkal News : वक्फ विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. काँग्रेस या कायद्याच्या विरोधात न्यायालयात गेली आहे. त्यातच रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला पद्मनाथ मंदिरातील सोने लंपास करायचा असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'वक्फ कायदा 1913 ला स्वातंत्र्याच्या आधी तयार झाला. स्वातंत्र्यानंतर देखील तो कायम होता. यात काँग्रेसचा काय संबंध? मंदिर, मशिदी, गुरुद्वारे, चर्च यांच्या पाॅपर्टीचे रक्षण करण्यासाठी विशेष कायदे आहेत. केरळचे जे पद्मनाथ मंदिर आहे त्या मंदिराच्या तळघरात रिझर्व्हे बँकेकडे नाही त्यापेक्षा जास्त सोने आहे.'

'मोदी सरकारला पद्मनाथ मंदिरातील हे सोनं लंपास करायचं आहे. पण तेथे डायरेक्ट हात घातला तर हात पोळतील म्हणून पहिला हल्ला वक्फवर केला आहे. वक्फ आल्याने आपल्या समस्या सुटणार नाहीत. ', असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

'राज्यात पाशवी बहुमत घेऊन राज्यसरकार काम करतंय. 288 पैकी 239 आमदार त्यांचे आहेत. येवढे बहुमत आहे तर त्यांनी काम करावं. दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, पण लाडक्या बहिणीला 2100 रुपयांचे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. कर्जमाफी केली नाही, शेतमालाला भाव द्यायला तयार नाहीत. चोर तर चोर आणि वर शिरजोर', अशी टीका सपकाळ यांनी महायुती सरकारवर केली.

काळाराम मंदिरात प्रवेश

बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. आत्ता संविधानाने सर्वांना समानतेचा हक्का दिला आहे, असे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी हातात संविधान घेत काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड,खासदार शोभा बच्छव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार

हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले, गारपीट, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आम्ही सरकारला केली आहे. आसमानी संकटासोबत सुलतानी संकट देखील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर आले आहे. यापूर्वीच पिकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. आणि त्यात अतिवृष्टी, गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी काँग्रेस आंदोलन करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT