Maharashtra FDA Raid : राज्यात भेसळमाफियांविरोधात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर कारवायांचा धडाका लावला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली 10 जूनला राज्यभरात एकाच वेळी मोठी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच संशयित आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर धाड टाकत तब्बल 3 कोटी 95 लाख 47 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या मोठ्या कारवाईत 21 जणांना अटक करण्यात आली, तर 17 आस्थापनांना सील करण्यात आले. याशिवाय अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहनही जप्त करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राज्यातील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात एकाच वेळी राबविण्यात आली.
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभरातील (Maharashtra) 13 आस्थापनांची तपासणी करत सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप आणि गूळ यांसारख्या खाद्यपदार्थांचा एक लाख सात हजार किलोहून अधिक साठा जप्त केला. या साठ्याची किंमत 3 कोटी 94 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र कारवाई करत 12 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईदरम्यान मुंबईत 3 जण, कोकणात 14 जण, पुण्यात 1 आणि नागपुरात 2 जण, अशा एकूण 21 आरोपींना अटक करण्यात आली असून 14.04 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर येथे रंगीत आणि निकृष्ट दर्जाची 3 कोटी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. तर धुळे इथं 73 लाख रुपयांचा भेसळयुक्त सुपारीचा साठा पकडला आहे. अंधेरी इथं कृत्रिम रंगमिश्रित चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर 1800 222 365 संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळमाफियांविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे राज्यभरातील अवैध भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.