Imtiaz Jaleel On Pahalgam Attack News Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel On Pahalgam Attack : गुप्तचर यंत्रणा काय करत होती? अतिरेकी हत्यारं घेऊन कसे घुसले ? पाकिस्तानला धडा शिकवा!

MP Imtiaz Jaleel raises serious questions on the government and intelligence agencies after terrorists infiltrated and attacked in Pahalgam. : श्रीनगर विमानतळ असू द्या, की शहरातील कोणताही रस्ता तिथे टप्याटप्यावर पोलीस, सुरक्षा जवान तैनात आहेत. मग पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झालाच कसा?

Jagdish Pansare

AIMIM News : काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांना गोळ्या घालून त्यांना ठार मारले. शेजारच्या पाकिस्तानमध्ये हल्याचा कट शिजला. अतिरेकी हत्यारासंह काश्मीरमध्ये घुसले तेव्हा आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. याची चौकशी तर व्हायलाच हवी, पण त्याआधी पाकिस्तानला या दहशतवादी हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्या.

ठोस प्रत्युत्तर देऊन पाकला असा धडा शिकवावा, की यापुढे जगातल्या कुठल्याच देशाची आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, असेही इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले. चार अतिरेक्यांनी काल दुपारी काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवला. पुरुषांना वेगळे करत आणि त्यांचा धर्म विचारत गोळ्या घातल्या. या अतिरेकी हल्यात देशभरातून काश्मीरमध्ये आलेल्या 27 पर्यटकांची हत्या करण्यात आली.

या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे. या भ्याड हल्ल्या संदर्भात (AIMIM) एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानला 'टीट फाॅर टॅट' प्रमाणे प्रत्युत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी करत असतानाच एवढा मोठा दहशतवादी हल्ला होत असताना आपली गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दल काय करत होते? असा सवालही केला.

श्रीनगर विमानतळ असू द्या, की शहरातील कोणताही रस्ता तिथे टप्याटप्यावर पोलीस, सुरक्षा जवान तैनात आहेत. विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची तर कित्येकदा तपासणी केली जाते. मग एवढी कडक सुरक्षा यंत्रणा, पोलीस बंदोबस्त असताना पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झालाच कसा? जे अतिरेकी सीमारेषा ओलांडून काश्मीरमध्ये घुसले तेही घातक हत्यारं घेऊन ते कसे? शेजारच्या पाकिस्तानमध्ये या अतिरेकी हल्ल्याच कट शिजला, मग आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती? याचा तपास झाला पाहिजे.

परंतु, त्याआधी निष्पाप पर्यटकांना ठार मारणाऱ्या अतिरेक्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. असा धडा शिकवा, की जगभरातील एकाही देशाची हिंमत आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची होता कामा नये. काश्मीरमधून कलम 370 हटवले म्हणजे सगळे सुरळीत झाले, असा सताधाऱ्यांचा जो भ्रम होता, तो या हल्ल्याने दूर झाला आहे. आता पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याची वेळ आली आहे, याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT