India MSME sector : इराण-अमेरिका युद्धाचा फटका भारतातील लघू आणि मध्यम उद्योगांना बसला असून, गॅस, काच आणि ‘पेट्रोकेमिकल’च्या तुटवड्यामुळे पुरवठा साखळी कोलमडली आहे.
विशेषतः राज्यातील पुणे, ठाणे, नवी मुंबई, वाशी इथल्या कारखान्यांवर संकट कोसळले आहे. येत्या तीन महिन्यांत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास 40 हजार कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कच्चा माल न मिळाल्याने गॅस, पेट्रोकेमिल्स, काच आणि प्लॅस्टिकवर अवलंबून असणाऱ्या अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. कच्चा मालाच्या किमती वाढल्या असून तयार मालाला वाढीव दर मिळत नसल्याने उद्योजक (Industry) अडचणीत सापडले आहेत.
भारतातील (India) 40 टक्के कंपन्या ‘पेट्रोकेमिकल’वर अवलंबून आहेत. विशेषतः ‘फार्मा’ कंपन्यांना काचेच्या बाटल्यांची आवश्यकता असते. मात्र, त्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे प्लॅस्टिकच्या बाटल्यांसाठी आवश्यक रेझिन मिळत नसल्याने उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
कित्येक कारखान्यांनी उत्पादन कमी केले असून, कामगार कपातही करण्यात आली आहे. परिणामी या महिन्यात ‘जीएसटी’ संकलन कमी होणार आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी गंभीर निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, "पश्चिम आशियातील युद्धामुळे ‘पेट्रोकेमिकल’चा तुटवडा आहे. लघुमध्यम उद्योगांना आवश्यक गॅस, काच, प्लॅस्टिक अशा कच्च्या मालाचा तुटवडा भासत आहे. जो माल मिळत आहे तो महाग आहे."
याशिवाय विक्रीला वाढीव किंमत मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे. सरकारने योग्य पाऊल उचलले नाही तर येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 40 हजार कंपन्या बंद होतील, अशी भीतीही चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.