ATS News : पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा प्रमुख शहजाद भट्टी यांच्या समवेत सोशल मीडियावर राज्यातील काही तरुण संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या धक्कादायक माहिती नंतर एटीएस कडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये छापा टाकण्यात आला.
या दोन जिल्ह्यासह राज्यात 150 ठिकाणी एटीएसने छापा टाकत तरुणांची कसून चौकशी केली. दरम्यान कोल्हापूर, कवठेमहांकाळ तासगाव मधील चौघांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. या चौघांनाही शहर न सोडण्याचे फक्त सूचना देण्यात आले आहेत.
दहशतवादी संघटनेची सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर राज्यभरातील पथकांनी एकाच वेळी सकाळी सात वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात केली. जवळपास 56 पथकाने 112 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तरुणांचा देखील समावेश होता.
मागील दोन वर्षांपूर्वी कोल्हापुराततील एका मध्यवर्ती ठिकाणी आणि हुपरीतील एका ठिकाणी एटीएसकडून छापे टाकण्यात आले होते. याची माहिती नागरिकांना कळाल्यानंतर हुपरीतील व्यक्तीच्या घरावर जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत तपास सुरू ठेवला आहे.
कोल्हापूर आणि सांगलीतील चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास करून सोडून देण्यात आले. शिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत शहर न सोडण्याचे सांगण्यात आले आहे. एटीएसच्या छाप्याची माहिती अत्यंत गोपनीय पद्धतीने झाली. शुक्रवारी दिवसभर याबाबत कोणालाही याची कुणकुण लागली नाही. मात्र या छाप्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.