Bharat Gogawle, Gram Panchayat Election Sarkarnama
कोकण

Gram Panchayat : गावात हरलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी शेवटी जिंकून दाखवलं

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Election : रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतीसाठी (Gram Panchayat Election) येत्या रविवारी निवडणूक होणार आहे. तरी यातील ५० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. ५० पैकी तब्बल ३८ ग्रामपंचायती जिंकून शिवसेनेच्या शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यातील ३२ ग्रांमपंचायती या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांच्या महाड विधानसभा मतदार संघातील आहेत.

२४० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ८८० अर्ज आले होते. त्यातील ११ जणांचे अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले होते. त्यामुळे ८६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच पदाच्या ३३८ उमेदवावांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता ५३१ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत आहेत. तर २४० ग्रामपंचायतीच्या १ हजार ९४० जागांसाठी ४ हजार ३८० अर्ज आले होते. यातील ५१ अर्ज छाननीत अवैध ठरले होते.

त्यामध्येही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसी १ हजार ०९१ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत ३ हजार २३८ उमेदवार आहेत. ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २० डिसेंबरला ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होणार आहे.

उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींची बिनविरोध झाल्या आहेत. महाड तालुक्यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. याशिवाय मुरूड तालुक्यातील १, पेण २, उरण १, खालापूर १, माणगाव ३, श्रीवर्धन ४, म्हसळा ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यातील ३८ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व राहीले आहे.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भरत गोगावले यांच्या गावातील निवडणूक झाली होती. येथे महाविकास आघाडीचा सरपंच निवडून आला होता. त्यामुळे राज्यभर त्याची चर्चा झाली होती. आता या निवडणुकीत मात्र, गोगावले यांनी सावध पावले टाकत निडणुकीआधीच आघाडी घेतली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकींसाठी कंबर कसलीआहे. आमदारांकडून आपआपल्या मतदारसंघातील वर्चस्व कायम राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाड विधानसभा मतदारसंघातील ३२ ग्रामपंचायती आम्ही बिनविरोध निवडून आणल्या. यावरून पक्षाला असलेला जनाधार स्पष्ट झाला आहे. मतदारसंघातील उर्वरीत ग्रामपंचायती निवडून आणण्याची आमची तयारी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ते स्पष्ट होईल, असे आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT