Bhaskar Jadhav-Ramdas Kadam
Bhaskar Jadhav-Ramdas Kadam Sarkarnama
कोकण

Jadhav VS Kadam : रामदासभाई नेमके कोणाला निवडून आणणार आहेत..? डॉ.नातू की बेटकर यांना..? : जाधवांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ (जि. रत्नागिरी) : गुहागार मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा) नुकताच मेळावा झाला. त्यात गुहागार मतदारसंघातून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार निवडून येणार असून त्याची जबाबदारी मी घेतली आहे, असे विधान माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले होते. त्याला या मतदारसंघाचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उत्तर दिले आहे. (Bhaskar Jadhav's reply to Ramdas Kadam's criticism)

माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात नुकताच मेळावा घेतला. त्या संदर्भात जाधव म्हणाले की, तो मेळावा न होता मेलावा झाला. त्या मेळाव्याची संध्याकाळी पाचची वेळ होती; मात्र रामदास भाई यांना आठ वाजता यावे लागले. तेथे कदम यांनी पुढचा आमदार शिंदे गटाचा असेल सांगत उमेदवार म्हणून बेटकर यांचे नाव घोषित केले. दापोलीत आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या सभेत व्यासपीठावर भाजपचे केदार साठे यांना सांगितले, डॉ. विनय नातू यांना निरोप द्या की तुम्ही कामाला लागा. आता म्हणतात, बेटकर यांना निवडून आणतो.

दापोली मतदारसंघातील ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला त्यांना भविष्यात मातीत घालायचेच या निर्धाराने आजपासून दापोली मतदारसंघात भगव्या सप्ताहाला सुरवात झाली, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार जाधव म्हणाले, बैल गेला नी झोपा केला अशीच अवस्था आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर अन्य राज्यात गेले असून लाखो तरुणांच्या तोंडातील घास या सरकारने काढून घेतला आहे. त्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प हे आम्हाला देशाचे पंतप्रधान मोदी देणार आहेत. मोदी यांचे एवढे मोठे मन नाही की, ते गुजरात सोडून महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देतील. महाराष्ट्राला खिळखिळे करणे, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे ती दुबळी करून राज्याचे महत्व कमी करणे अशाच प्रकारचा कार्यक्रम केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री दावोसला गेले का की अन्य ठिकाणी गेले तरी काही हाताला लागणार नाही. त्यांची केवळ ट्रीप होईल.

कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर शेतकरी सदस्यांमधून कोकणाबाहेरील शेतकऱ्यांची नियुक्ती कृषिमंत्री यांनी केली आहे. त्याबद्दल बोलताना जाधव म्हणाले, या संदर्भात आपण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. तुम्ही काय काय चोरून नेणार आहात महाराष्ट्रातून? आता आमच्या विद्यापीठाचे सदस्यही तुम्ही चोरून नेत आहात, असे सभागृहात विचारले त्या वेळी सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते; मात्र कोणीही याचा प्रतिवाद केला नाही.

आम्ही संघर्ष करत आहोत; मात्र प्रत्येक बाबतीत कोकणावर अन्याय करण्याची पद्धत अजूनही सुरूच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या भागावर अन्याय झाला की, त्या अन्यायाविरोधात ज्या तडफेने, ज्या आक्रमकपणे तुटून पडायला पाहिजे तसे पडत नाहीत. मी हा प्रश्न विचारला तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्रीही सभागृहात होते; मात्र तेही तेव्हा काही बोलले नाहीत, असा दावाही जाधव यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT