uddhav thackeray | devendra fadnavis | bhaskar jadhav  sarkarnama
कोकण

Bjp Vs Shivsena : भाजपला मोठा धक्का बसणार! भास्कर जाधवांच्या मध्यस्तीनं बडा नेता ठाकरे गटात?

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात उलट्या दिशेने वारे वाहत आहे. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) आणि काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यातच भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपच्या माजी आमदारानं आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांच्यासोबत 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून हे माजी आमदार लढण्यासाठी इच्छुक आहेत. रत्नागिरी मतदारसंघातून सध्या मंत्री उदय सामंत हे आमदार आहेत. जागावाटपात विद्यमान आमदारांच्या सूत्रानुसार ती जागा संबंधित पक्षाकडेच राहणार आहेत. त्यामुळे भाजपच्या माजी आमदारानं ठाकरे गटाशी जवळीकता वाढवली आहे.

हे भाजपचे माजी आमदार म्हणजे बाळ माने. सध्या बाळ माने हे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. माने दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी माने यांनी साडू आणि आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर 'मातोश्री'वर गेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांना तिकीट मिळणार नसल्याची खात्री पटली आहे. म्हणून बाळ माने यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, बाळ माने यांनी कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण, माने यांच्या प्रवेशानंतर कोकणात शिवसेनेला ( ठाकरे गट ) बळ मिळणार आहे. तसेच, भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं.

पक्षात येणाऱ्यांचे स्वागतच....

"भाजपचे माजी आमदार बाळ माने असो की अन्य कोणी सर्व सर्वसामान्य कार्यकर्ता असो, पक्षवाढीसाठी शिवसेनेत ( ठाकरे गट ) येणाऱ्यांचे स्वागतच केले जाईल. 'मातोश्री'कडून जे आदेश येतील, त्यानुसार विधानसभेला जो उमेदवार देतील, त्याचे प्रामाणिक काम केले जाईल," असं शिवसेनेचे ( ठाकरे गट ) सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे. महाडिक यांचे वक्तव्य सूचक मानलं जात आहे.

वैयक्तिक कामासाठी माने 'मातोश्री'वर गेले असतील...

बाळ माने यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांना भेटल्याच्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "बाळ माने यांची ती व्यक्तिगत भेट आहे. त्यावर बोलणं योग्य नाही. मात्र, ते महायुतीत आमचे सहकारी असून, भाजपचे चांगले काम करत आहेत. त्यामुळे माने हे वैयक्तिक कामासाठी गेले असतील. त्यांच्या भेटीवर मी शंका घेणे योग्य नाही," असं सामंत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT