Uddhav Thackeray On Bjp  Sarkarnama
कोकण

Konkan Politics : सिंधुदुर्गात चढता पारा; 'चाय पे चर्चे'ला ठाकरे गटाच्या 'होऊ दे चर्चा'चा उतारा

Deepak Kulkarni

Ratnagiri Politics : भाजपने खूप आधी आणलेल्या चाय पे चर्चा या फंड्यावर ठाकरे सेनेने 'होऊ दे चर्चा' हा कार्यक्रम राज्यभर सुरू केला आहे. गणपतीत काहीशी उसंत घेऊन पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाने सिंधुदुर्गात राजकीय पारा चढू लागला आहे. रत्नागिरीत मात्र 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमात चर्चा होत आहे, पण कार्यक्रमाची चर्चा मात्र होताना फारशी दिसत नाही.

मोदी सरकारच्या(Modi Government) काळात जनतेच्या मूळ प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यावर या कार्यक्रमातून भर दिला जात आहे. महागाई, बेरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार हे मुद्दे तर आहेतच पण संविधानिक संस्था मोडकळीस आणण्याची कारस्थाने, ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर, सत्तेसाठी सत्तेचा दुरुपयोग, भाजपचे वाशिंग मशिनचे तत्त्व शून्य राजकारण या मुद्द्यांवर फोकस करणारा हा कार्यक्रम आहे.

विरोधकांनाही या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमने-सामने येण्याचे आवाहन देण्यात येत आहे. यातून राजकीय गरमागरमी वाढवून त्याचे राजकीय मायलेज मिळविण्याचा ठाकरे शिवसेनेचा मनसुबा आहे.

सिंधुदुर्गात 'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमाने राजकीय पारा वाढल्याचे चित्र आहे. मालवण तालुक्यातील पोईपजवळ भाजपच्या जमावाने सभेत प्रश्न आणि जाब विचारायला सुरुवात केल्याने मोठा गोंधळ झाला. पूर्वी राणे सेनेनंतर काँग्रेस, त्यानंतर स्वाभिमानी आणि आत्ता भाजपसोबत असलेल्या या कार्यकर्त्यांनी होऊ दे चर्चामध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) अडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न अर्थातच व्हायरल झाला. ठाकरे सेनेचा कार्यक्रमामागचा हेतू अशा विरोधाने सफल होताना दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मात्र "होऊ दे चर्चा"ने अद्याप उठाव झाल्याचे चित्र तूर्तास नाही. शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे भास्करराव जाधव यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत येत मंत्री झालेल्या उदय सामंतांनी ऐनवेळी उद्धव ठाकरेंची सेना ही सोडली. शिंदे सरकारला सामील झाले. यातून सामंत यांच्याविरुद्ध मूळ ठाकरे सेनेत चीड आहे.

चिपळूण, संगमेश्वर राष्ट्रवादीच्या शेखर निकमांकडे आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात गेले तरी त्यांचा आता प्रभाव किती आहे हे प्रश्नचिन्ह आहे. मंडणगड, दापोली योगेश कदम यांच्याकडे आहे. जे शिंदे गटात आहेत. राजापूर राजन साळवी सांभाळत आहेत. गुहागरचे भास्कर जाधव आणि सिंधुदुर्गची राणे फॅमिली यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे.

सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न'ला राणे यांच्या फळीतील भाजपकडून अरे ला कारे सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तूर्तास जरी नसली तरीही येत्या एक-दोन दिवसांत ठाकरे गट अधिक आक्रमकपणे हा कार्यक्रम राबविणार असल्याचे संकेत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT