CM Eknath Shinde, Ambadas Danve , Aaditya Thackeray Sarkarnama
कोकण

Irshalwadi Landslide : CM शिंदेंचा दहा तास इर्शाळवाडीत तळ, आदित्य पावसात, दानवे चिखलात...

सरकारनामा ब्यूरो

दीपक कुलकर्णी -

Raigad : इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide)दरडीत गाडली गेली, शे-दोनशे लोक ढिगाऱ्याखाली अडकले. तेवढेच जण जीवाच्या आकांताने ओरडू लागले. घरातली माणसं, कर्तेधर्ते, चिमुरडी मुलं गाडली गेली हे पाहून आया-बहिणींनी कंठ फोडला,. हे सगळं कानावर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशन आटोपलं, मुंबई सोडली, वाहनांच्या गर्दीतून पुढे डोंगर दऱ्यातून, चिखलातून, ढिगाऱ्यातून वाट काढत, वाट तुडवत ते इर्शाळवाडीच्या शिवेवर पोहचले. डोळ्यादेखतचं ह्दय पिळवटून टाकणारी ही घटना, त्यात लोकांना धीर देण्यासाठी धडपड करत ते तब्बल दहा तासांहून अधिक काळ इर्शाळवाडीत यंत्रणेवर लक्ष ठेवत तळ ठोकून आहे.

पाठोपाठ राजकारण बाजूला सारुन युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) हेही इर्शाळवाडीत पोहचले. राजकीय कमेंट करण्यापेक्षा लोकांशी बोलत ते धीर दिला. आणि प्रशासकीय यंत्रणेला बळ दिले. परिणामी या घटनेनं राजकारणापलीकडचे शिंदे, आदित्य आणि दानवे हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde),विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दुर्घटनेची माहिती मिळताच इर्शाळवाडीतील पहाटे दाखल झाले. शिंदे आणि दानवे हे तब्बल दहा ते बारा तासांपासून घटनास्थळी तळ ठोकून आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजत मुख्यमंत्री शिंदे, दानवे, ठाकरेंनी नागरिकांशी संवाद साधत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला ते सूचना देत होते. खालापूरमध्ये त्यांनी एक बैठकही घेतली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली.

रायगडमधील इर्शाळवाडीला पावसानं घेरलं, वाडीभोवतीच्या दरडी कोसळल्या. गाव गाडलं गेलं. ही वेळ होती बुधवारच्या रात्रीची साडेदहा वाजताची. आधीच पावसाने घेरलेल्या मुंबईकरांना सुखरुप ठेवण्यासाठी शिंदे - फडणवीस - पवार सरकारची यंत्रणा झटत होती. त्यात शिंदेही रस्त्यावर होतेच. त्यानंतरच्या काही तासांतच इर्शाळवाडीत भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. याचं गांभीर्य लक्षात घेऊन शिंदेंनी आपला ताफा इर्शाळवाडीकडे वळवला आणि मदतकार्याला वेग दिला.

त्यामागोमाग दानवेही तिथे पोहचले. गुरूवारी दुपारी आदित्य हेही घटनास्थळी आले. एऱवी या तिघांमध्ये राजकारणावरुन आरोप - प्रत्यारोपांची चिखलफेक होते. पण या घटनेवरुन एकाही नेत्यानं किमान इर्शाळवाडीच्या हद्दीत तरी आरोपाचं राजकारण केलं नाही. त्यामुळे राज्यातील या बड्या राजकारण्यांचा एकोपा दिसून आला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT