Ambarnath Municipal Council; Eknath Shinde sarkarnama
कोकण

Shivsena Controversy : 'भ्रष्टाचार-चोरी काही प्रमाणात..., पण परसेंटेज...' शिंदेंच्या उपनगराध्यक्षांचं खळबळजनक वक्तव्य, पत्रकारांनाही दमदाटी

Ambarnath Municipal Council Deputy President Statement Controversy : मुंबई पालिकेत निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून हा दुजाभाव फक्त परसेंटेजसाठी केला जात असल्याचा दावा केला.

Aslam Shanedivan

Ambernath Municipal Council News : राज्यात महायुतीची आणि दिल्लीत भाजपप्रणीत एनडीएची सत्ता आहे. याच गोष्टीचा फायदा आता सत्ताधारी घेताना दिसत आहेत. यावरून शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आवाज उठवत भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. मुंबई पालिकेत निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करताना त्यांनी हे सगळं फक्त परसेंटेजसाठी केलं जात असल्याचा दावा देखील केला होता.

आता हा दावा खरा ठरणारे वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष यांनीच भरसभागृहात, "भ्रष्टाचार झाला पाहिजे, पण टक्केवारी कमी असायला पाहिजे," असे खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या विधानानंतर खळबळ उडाली असून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनादेखील त्यांनी दमदाटी केली आहे. यामुळे अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परब यांनी विधान परिषदेत मुंबई महानगरपालिकेतील निधी वाटपातील दुजाभावावरून आरोप करताना सरकार आणि पालिका प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यांनी मुंबईत ठाकरेंचे 65 नगरसेवक असून त्यांच्या वॉर्डांतील विकासकामांसाठी केवळ 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याउलट भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना अडीच कोटींपासून ते थेट 15 कोटी रुपयांपर्यंत निधीच्या नावाखाली खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप केला.

तसेच, विकासाच्या नावाखाली कोटींच्या घरात वाटलेला निधी फक्त टक्केवारीसाठी असल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांची राज्यात चर्चा सुरू असतानाच अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी, "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे. पण परसेंटेज कमी असायला पाहिजे," असे खळबळजनक वक्तव्य केलं. या विधानानंतर आता पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ३) आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत काही कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष पाटील यांनी, "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे," असे वक्तव्य केलं.

यावेळी त्यांच्या शेजारी नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांनी थेट डोक्याला हात लावत त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला. तसेच, "समोर पत्रकार आहेत, शांत राहा," असेही सांगितले. मात्र, "खरं बोलायला कसली भीती? कोणी फाशी थोडीच देणार आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सभागृहाबाहेर आणि पालिकेच्या आवारात सुरू झाली.

यावरून पत्रकारांनी त्यांना घेरत प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला. तसेच, "मी भ्रष्टाचार होऊ नये, असं म्हणालो," अशी सारवासारव केली. मात्र, कॅमेरे बंद होताच त्यांनी पत्रकारांना दमदाटी केली. याचवेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुळे यांनी या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. तर त्यांच्यावर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT