Vinayak Raut
Vinayak Raut Sarkarnama
कोकण

'मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेनेचे १०० आमदार निवडून येतील'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बंडखोर आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कपटनीतीच्या विरोधात जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विधानसभेची मध्यावधीची निवडणूक झाली तर आम्हाला खात्री आहे की शिवसेनेचे (Shivsena) १०० आमदार राज्यातील जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. तसेच, उदय सामंत हे आयत्या बिळावरील नागोबा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. (If mid-term elections are held, 100 Shiv Sena MLAs will be elected : Vinayak Raut)

रत्नागिरीचे खासदार राऊत यांनी माध्यमाशी बोलताना रत्नागिरीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशी ग्वाहीही दिली. ते म्हणाले की, शिवसेना पक्ष आजही मजबुतीने उभा आहे. जे आमदार खरेदी-विक्रीच्या बाजारात विकले गेले आहेत, त्याची चिंता आम्हाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘१९६६ च्या वेळेची शिवसेना आहे, असं गृहीत धरून आम्ही पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदी शिवसेना उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे बंडखोरांच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या कपटनीतीच्या विरोधात जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंची असून ती भक्कम आहे. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आयत्या बिळावर नागोबा या प्रमाणे इतर पक्षातून त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला होता. सामंत आणि केसरकर यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, तर शिवसेनेने त्यांना वाढवलेले आहे. त्यामुळे रत्नागिरीमधील शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे. ती बंडखोरांची नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

राजन साळवी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात उदय सामंतांना आम्ही अजिबात सामावून घेणार नाही. उदय सामंतांना १० तारखेच्या मेळाव्यात येण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी मेळाव्याला येऊ नये. रत्नागिरीमधील दोन आमदार आपण शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. मात्र, तसा दावा करण्याचा नैतिक अधिकारच त्यांना नाही. हिम्मत असेल तर सांगा की आम्ही भाजपवाशी झालो आहोत. एक तर तुम्हाला शिवसैनिकांनी निवडून दिलं आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही भाजपमध्ये गेलात. आता तुम्ही शिवसेना पक्ष विकायला निघाला आहात. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, अशी कडवट टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT